ऑनलाईन टीम / येरेआन :
आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशात नागोर्नो-काराबाख या विभाजनवादी भूभागावरून मागील आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अझरबैजानचे मोठे नुकसान झाले असून, तिथे आतापर्यंत 3 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
नागोर्नो-काराबाखला आंतरराष्ट्रीय पातळीवर अझरबैजानचाच भाग मानला जातो. मात्र, या भूभागावरून दोन्ही देशातील संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशात सध्या लढाई सुरू असून, तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर यांच्या मदतीने थेट एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या लढाईत आतापर्यंत 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा रिपब्लिक ऑफ आर्तसखच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरीने केला आहे.
अनेक मृतदेह अशाठिकाणी पडून आहेत, जिथून त्यांना बाहेर आणले जाऊ शकत नाही. दोन्ही देशांनी 4 हजार 400 चौरस किलोमीटर परिसरातील नागोर्नो-काराबाख या भूभागावर दावा केला आहे. या भूभागावर सध्या आर्मेनियातील स्थानिक सशस्त्र गटांचा ताबा आहे.
संयुक्त राष्ट्रांनी लढाईची भीषणता लक्षात घेत युरोपीय देशांनी या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच लढाई सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने मानवतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती सर्व मदत (अन्नधान्य, पाणी आणि औषधे) देणार असल्याचे जाहीर केले आहे.