युक्रेन ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर सुखरूप प्रवास
प्रतिनिधी / कोल्हापूर
वैद्यकीय शिक्षणासाठी कोल्हापुरातून गेलेल्या आर्या चव्हाण व ऋतुजा कांबळे यांचे कोल्हापुरात आगमन झाले आहे. आपली मुलगी घरात येताच पालकांच्या आनंदाश्रुंना आकाश ठेंगणे झाले आहे. फुलांच्या वर्षावात आपल्या मुलीचे स्वागत करीत, सोमवारी गोडा-धोडाच्या मेजवाणीचा बेत केला होता. दोघींच्याही नातेवाईकांनी दूरध्वनी व प्रत्यक्ष भेट घेवून पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. दोघींच्याही पालकांनी आपली मुलगी सुखरूप परत आल्याने सुटकेचा श्वास सोडला.
युक्रेनवर रशियाने हल्ला करण्याचे जाहीर केल्यानंतरच आर्या व ऋतुजा युक्रेनची राजधानी किव्ह येथून विमानाने परत येणार होत्या. पण किव्ह विमानतळावरच रशियाने बॉंबहल्ला केल्याने विमानतळ उध्वस्त झाले. भारत सरकारच्या मदतीने इतर भारतीय विद्यार्थ्यांबरोबर या दोघी रुमानियाला दहा तासाचा बसने प्रवास करून आल्या. रूमानियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसह इतर देशातील सर्वच विद्यार्थ्यांना चहा, नाष्टा, जेवण यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची मोफत सोय रूमानिया नागरिकांनी केली होती.
परंतू युध्दजण परिस्थिती असल्याने आपण भारतात परत जाणार की नाही, अशी भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. भारतीय विमानाने जेंव्हा ऋतुजा आणि आर्या मुंबईत आल्या तेंव्हा त्यांनी सेल्फी काढत आनंद व्यक्त केला. शनिवारी रात्री आठ वाजता मुंबई विमानतळावरून ऋतुजा यांच्या नातेवाईकांकडे मुंबईत राहिल्या. रविवारी आर्याची आई नेहा चव्हाण, मामा अमित लोखंडे आणि ऋतुजाची आई रेखा कांबळे व वडील जेलित कांबळे आणि लहान भाऊ सुमित कांबळे हे मुंबईला गेले होते.
मुंबई ते कोल्हापूर चारचाकीने प्रवास करीत सोमवारी पहाटे तीन वाजता कोल्हापुरात पोहचल्या, तेंव्हा घरात आनंदाचे वातावरण होते. आपले घर पाहुण दोघींनाही रडूच कोसळले होते. डिसेंबरमध्ये युक्रेनला गेलेल्या या दोघीही तब्बल दोन महिन्यांनी घरी आल्याने त्यांचा चेहऱयावरील आनंद पाहूण घरातल्यांना आश्रु अनावर झाले आहेत.
सुरक्षित वाटतय
युक्रेनमधून कोल्हापुरात आपल्या घरी दोन महिन्यानंतर आल्याने सुरक्षित वाटतय. घरी आल्यानंतर आईने करून दिलेल्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारलाच, पण तेथील परिस्थितीवर आई-वडीलांबरोबर गप्पा मारल्या. युध्द सुरू झाल्यानंतर आपण जीवंत राहू की नाही अशी भिती मनात होती. आई-वडीलांच्या आठवणीने रडण्याव्यतिरिक्त काहीच हातात नव्हते. परंतू भारत सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षीत घरी आणल्याबद्दल त्यांचे आभार मानल तेवढे थोडेच. युक्रेनचे शिक्षण अतिशय चांगले आहे. कॉलेजला 11 मार्चपर्यंत सुट्टी असून 14 मार्चपासून ऑनलाईन शिक्षण सुरू होणार आहे. आतापर्यंत एक परीक्षा झाली असून, आणखी 9 विषयांची परीक्षा होणार आहे. युक्रेनमध्ये पुर्ववत परिस्थिती झाल्यावर मी शिक्षणासाठी तिकडे जाणार आहे. – ऋतुजा कांबळे
फुलांच्या वर्षावात स्वागत
युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर आमच्यात भितीचे वातावरण होते. संकटसमयी आम्ही सर्व भारतीय एकत्र राहिलो, आमच्या सिनिअर विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप दिलासा दिला. मुंबईत आणि तेथून कोल्हापुरात आल्यानंतर जो आनंद झाला आहे. तो शब्दात सांगता येत नाही. घरात आल्यानंतर वडील अनिल चव्हाण, काका सचिन चव्हाण, काकी सायली चव्हाण आणि भाऊ साईराज, बहिण समृध्दी यांनी फुलांच्या वर्षावात स्वागत केले. सोमवारी घरात अगदी आनंदाचे वातावरण होते. माझ्या आवडीचे पदार्थ करून आम्ही एकत्रितपणे जेवनाचा अस्वाद घेतला. हा आनंद कोणत्या शब्दात सांगू समजत नाही. – आर्या चव्हाण
कोल्हापुरची शाकंबरी लोंढे-पाटील युक्रेनमध्ये अडकली
कोल्हापुरची आणखी एक विद्यार्थीनी शाकंबरी लोंढे-पाटील युक्रेनमध्ये अडकली आहे. तिने भारतीय विद्यार्थ्यांच्या बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. ती सुरक्षित आहे, परंतू रसियाकडून होणाऱया हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे आपण घरी कधी जातोय याची तिला ओढ लागली आहे.