आसाममधील अतुल दास नामक मेकॅनिकने चार आसनी स्कूटरची निर्मिती केली आहे. दास यांची ए. डी. ऑटोमोबाईल्स नामक कंपनी असून त्यांनी दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर या स्कूटरच्या निर्मितीत यश मिळविले आहे. सध्या स्कूटर किंवा बाईकवर दोन किंवा वेळ पडल्यास जास्तीतजास्त तीन माणसे बसू शकतात. पण या नव्या स्कूटरमुळे संपूर्ण कुटुंबाची सोय होऊ शकते असे निर्मात्याचे म्हणणे आहे. जुन्या स्कूटर्स खरेदी करून त्यांना विशिष्ट प्रकारे जोडून ही बनली आहे.
या स्कूटरची निर्मिती केल्यामुळे अतुल दास यांचे पंचक्रोशीत कौतुक होत असून मध्यम वर्गीय कुटुंबांची त्यांनी सोय केल्याचे बोलले जात आहे. चार जणांचे कुटुंब या स्कूटरवरून सुखावहरित्या प्रवास करू शकते. दास यांनी स्वतःच्या कुटुंबासह या स्कूटरवरून अनेक जिल्हय़ांमध्ये प्रवास केला आहे. सुलभतेच्या दृष्टीने ही स्कूटर कोठेही कमी पडत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांना सरकारच्या अनुमतीची प्रतीक्षा असून ती मिळाल्यानंतर या स्कूटरची विक्री मोठय़ा प्रमाणावर करण्याची योजना त्यांनी आखली आहे. या स्कूटरमुळे इंधनाचीही बचत होते. तसेच अधिक सामानाची वाहतूकही होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.