पालिका वॉर्ड आरक्षण घोळाला धरले जबाबदार : मंत्री नाईक यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणी पालिका आरक्षणावरुन भाजपमध्ये धुसफूस सुरु
प्रतिनिधी / पणजी
पालिका वॉर्डाचे आरक्षण, पुनर्रचना यावरून भारतीय जनता पक्षात धुसफूस सुरू झाली असून आमदारांमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. वॉर्डाचे आरक्षण अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने झाल्याचे स्पष्ट मत भाजपचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी प्रकट करून नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांना हटवण्याची मागणी केली आहे.
मंत्री नाईक यांचे खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताब्यात घेऊन स्वतः चालवावे, असेही आल्मेदा म्हणाले. तशा आशयाचे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडेही हा विषय बोललो असून आता त्यांनीच काय ते ठरवावे, आणि निर्णय घ्यावा, असे आल्मेदा यांनी सूचित केले.
मंत्री नाईक यांना मंत्रिमंडळातून वगळावे
पालिका निवडणुकीसाठी वॉर्डाचे आरक्षण-पुनर्रचना यामुळे गोंधळ माजला असून तो वाढत आहे. त्यास नगरविकासमंत्री नाईक हे जबाबदार असून त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे, अशी मागणी आल्मेदा यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलताना केली.
वॉर्डांच्या आरक्षणास कोणताचा आधार नाही
वॉर्डाच्या आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारही निराश झाले असून त्याचाच परिणाम म्हणून अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. या आरक्षणावरून अनेकजण संतापले असून कशाच्या आधारावरून आरक्षण करण्यात आले तेच कळत नाही आणि आरक्षणास कोणताही आधारच नसल्याचा दावा आल्मेदा यांनी केला.
मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळीत मोठा घोळ
मुरगाव नगरपालिकेच्या वॉर्डाचे आरक्षण एका पद्धतीने करण्यात आले असून पहिले 1 ते 9 असे सलग वॉर्ड फक्त पुरुषांसाठीच आहेत. तेथे महिलांना स्थान नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले तर मडगाव पालिकेतील वॉर्ड आरक्षण दुसऱयाच पद्धतीने झाल्याचा आरोप आल्मेदा यानी केला. कुंकळ्ळी पालिकेतील वॉर्डातही आरक्षणात घोळ घालण्यात आला असून भाजपचे नगरसेवक तसेच इच्छूक उमेदवारही त्यावर समाधानी नाहीत, असे आल्मेदा यांनी नमूद केले.
… तर मग आरक्षणावरून गोंधळ होण्याची कारणे कोणती?
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण आहे, परंतु ते या पालिका वॉर्डातील आरक्षणात कुठेच दिसत नाही. मुख्यमंत्री सांगतात की नियम कायद्यानुसार आरक्षण करण्यात आले आहे. मग एवढा आरक्षणावरून गोंधळ होण्याची कारणे कोणती? असा सवाल आल्मेदा यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांखळीकडे लक्ष द्यावे, अन् नंतरच बोलावे
सांखळी पालिकेची निवडणूक देखील आज ना उद्या होणार आहे. तेव्हा तेथे कसे आरक्षण होते ते दिसून येईल. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष ठेवावे आणि मग बोलावे असेही आल्मेदा म्हणाले. ज्यांनी हे आरक्षण केले त्यांनी हवे ते केले अशी प्रतिक्रिया आल्मेदा यांनी दिली.
पालिका निवडणूक पक्षीय पातळीवर होणार नाही. त्यामुळे पक्षाचा नाही तर चिन्हांचा संबंध येतो. मतदार उमेदवार बघुनच मतदान करणार आहेत. पक्ष नव्हे, असे सांगून आल्मेदा यांनी एकंदरीत आरक्षणाबाबत तीव्र नापसंती व संताप प्रकट करून आपल्याच पक्षाला, मंत्र्याला घरचा अहेर दिला आहे.