आळंदी/प्रतिनिधी
महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी पायी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या सावटामुळे रद्द करण्यात आला आहे. परंतु काही वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा फक्त दहा मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मात्र तत्त्पूर्वी प्रशासनासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या ३६८ वारकऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील ३७ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट पहायला मिळत आहे. गुरुवारी २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यात आता अजून १५ जणांची भर पडली आहे, तशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिलीय.