थंडीत कुडकुडत घरकाम करण्याचा किंवा शाळेत-ऑफिसला जाण्याचा तुम्हाला नक्कीच कंटाळा येत असणार. पण कोणीसं म्हटलेलं आहेच ना की ‘टाक झटकूनी आळस जीवा’..त्याप्रमाणे ऐन काकडवून टाकणाऱया वातावरणातही आपल्याला नित्यकर्मे ही करावीच लागतात. थंडीतलं वातावरण तरुणांसाठी भले छान रोमांचक वगैरे असेल पण सर्वच वयोगटासाठी ते तसं नसतं. मुळात या दिवसात उशिरा उजाडतं व लवकर दिवस मावळतो. त्यामुळे बराच काळ काळोखाचं साम्राज्य असतं. अंधार हा वातावरणात नेहमीच काहीसा निरुत्साहीपणा आणतो. शिवाय त्याच्या जोडीला गार वारेही असतात. त्यामुळे या दिवसात अंगात आळस कसा अगदी साचतच जातो. तर हा आळस आलेला असतो तो ऋतुमानामुळे, काही सोपे उपाय केले तर अशा निरस वातावरणातही छान उत्साही वाटू शकतं.
सुरुवात अगदी झोपेतून उठल्यापासूनच करायची झाली तर बिछान्याच्या बाहेर आल्यावर थोडं स्ट्रेचिंग म्हणजे शरीराचे स्नायु मोकळे करण्यासाठी हालचाल करून ताण देणं अत्यंत जरुरी आहे. यामध्ये मानेचे, खांद्याचे व पायाचे छोटे बैठे व्यायाम म्हणजे पद्धतशीर हालचाली कराव्यात. त्यामुळे गारठय़ाने झोपेत आखडलेल्या नसा, स्नायु हे मोकळे होतात. कुठे वावडं आलं असेल तर तेही निघून जातं. अशा प्रकारे स्ट्रेचिंगने आळस अंगावरून दूर होतो. यानंतर सकाळचा व्यायाम हादेखील थंडीच्या दिवसात कितीही कंटाळा आला तरी जरुरी आहे. हा चुकवू नका. थंडीच्या दिवसात एक प्रकारची उदासीनता अंगावर व मनावर साठत जाते. पाश्चात्य देशात गारठय़ाचा कडाका आपल्यापेक्षा खूपच जास्त असतो. तिकडे बर्फवृष्टीमुळे लोकांना बाहेरचे व्यवहार करता येत नाहीत. अशा दिवसात तिथे औदासिन्याचे रोग वाढतात. अर्थात आपल्याकडे एवढी खूप जास्त थंडी नसते तरीही थोडा मरगळलेपणा हा येतोच. अशा वेळी प्राणायाम व योगासनं हा यावर उत्तम उपाय आहे. शरीराला सकाळी उठल्यावर काही नियमित व्यायामांची सवय लावली तर आपोआपच शरीरात एक प्रकारची शिस्त येईल, जी आळस झटकून टाकण्यासाठी उपयोगी पडेल.
थंडीत अनेकांचे श्वसनासंबंधी विकार वाढीस लागतात. सकाळी नियमित दीर्घश्वसन केल्याने श्वास स्वच्छपणे घेता येतो. दिवसाला सुरुवात करण्याआधी प्रत्येक दिवसाचं एक ध्येय ठरवून टाका. हे ध्येय म्हणजे काही कामच असेल असं नाही, त्यात तुम्हाला आवडणारी एखादी गोष्टही असू शकेल, जसं मित्र-मैत्रिणींना भेटणं वगैरे. दिवसाची सुरुवात करतानाच त्याविषयी विचार करा. म्हणजे आपोआपच विचारांना व शरीराला चालना मिळेल. हे काम आज पूर्ण करायचंच, असं ठरवून टाका. त्यामुळे आपसूकच शरीराला एक गती मिळते. सकाळी उठताना मनात नेहमी काहीतरी सकारात्मक विचार आणा. त्याविषयी पुढचा विचार करा. यातून मनावरची मरगळ दूर होईल. सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नका, त्यात कर्बोदकं कमी असलेला जास्त प्रोटीनयुक्त नाश्ता घ्या. शक्मयतो खूप जड नाश्ता करू नका. त्यामुळे सुस्ती अजूनच वाढेल. या दिवसात पाणी कमी प्यायलं जातं व ते लक्षात येत नाही. त्यामुळे पाणी जास्त प्या. गरम पाणी किंवा तत्सम उत्साहवर्धक पेय नाश्त्याआधी जरूर घ्या. थंडीमध्ये उठून बाहेर जॉगिंग, रनिंग वगैरेसाठी जाणं जरा कठीणच वाटत असेल तर घरच्या घरीच असे पूरक व्यायाम करा. इमारतीच्या गच्चीमध्ये जाऊन फेऱया मारून या.
ज्यांना पक्षी निरीक्षण, मॉर्निंग वॉक, फोटोग्राफी इत्यादीची आवड असेल त्यांच्यासाठी निश्चितच हिवाळय़ात बाहेर जाण्यासाठी कारण असतं. तुम्हीही अशा काही अŸक्टिव्हीटीजमध्ये सकाळी स्वत:ला गुंतवून घ्या. मुख्य म्हणजे रात्रीची आठ तासांची झोप व्यवस्थितपणे पूर्ण कराच. अन्यथा उठतानाही झोप अपूर्ण राहून आळस झटकणं कठीण होऊन जाईल. जमल्यास अŸरोमा थेरपीचा वापर हिवाळय़ात सकाळी घरामध्ये किंवा आंघोळ करताना करावा, त्यामुळे एकंदरीतच उत्साह वाटेल व दिवसाची छान सुरुवात करता येईल.