विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला
मुंबई / प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायच्या दिवशी आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. राज्यपालांच्या या भुमिकेने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असून यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सुत्रानुसार आज संध्याकाळपर्यंत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेविषयी सविस्तर उत्तर दिलेल आहे. राज्यपाल म्हणाले आहेत की, आवाजी पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया घटनाबाह्य आहे. म्हणजेच आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच निवडणूक होणार की नाही याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दोन पत्रे पाठवून शिफारस केली होती. मात्र राज्यपालांनी वेगवेगळी कारणे दिल्याने मुख्यमंत्री तिसऱ्यांदा राज्यपालांना पत्र पाठवणार आहेत.