प्रतिनिधी / कोल्हापूर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली असली तरी अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबदारी प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी.एन. पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना आवाडे तसेच प्रकाश आवाडे यांचे काँग्रेस पक्षासोबत 50 वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सोमवारी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस साजरा कारण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था देण्याचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालीबाबत कोणतीही चर्चा नाही. भाजप मधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नींना ईडीने नोटीस बजावली असली तरी ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत असल्याची टिकाही पालकमंत्री पाटील यांनी केली. केवळ सुडबुद्धीने भाजपकडून ही कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, आवाडे कुटुंबीयांचे काँग्रेस पक्षासोबत 50 वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. लवकरच त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून आमदार पी.एन.पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
विनय कोरे यांच्याशी लवकरच चर्चा
महापालिकेच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांना सोबत घेण्याबाबत अद्याप आपली चर्चा झालेली नाही. मात्र लवकरच आमदार कोरे यांच्याशी चर्चा करणार आहे. मनपाच्या राजकारणात आजपर्यंत ते आमच्यासोबतच आहेत,असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार असली तरी एखादा घटक पक्ष आमच्यासोबत आल्यास त्याला बरोबर घेऊन निवडणूक लढवली जाईल असे पाटील यांनी सांगितले
.
जनमताचा कौल घेऊनच मनपाची उमेदवारी
महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची उमेदवारी देताना त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याच्या भावना, जनमताचा कौल लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक प्रभागात सर्व्हे करून इच्छूक उमेदवाराबाबत मत आजमावले जाईल. ज्या उमेदवारांबाबत लोकभावना चांगल्या आहेत, त्यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.