ऑनलाईन टीम / जैसलमेर :
भारत समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणीही भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला उत्तरही जोरदार मिळेल. भारत आपल्या हितांविरोधात कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे.
पंतप्रधान मोदी दरवर्षीप्रमाणे जैसलमेरच्या लोंगेवालमध्ये जवानांसोबत आपली दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी मोदींनी जवानांना संबोधित केले. मोदी म्हणाले, जवानांनी देशाला सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे आज भारत जागतिक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे. भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला उत्तरही तसेच जोरदार मिळेल. भारत समजूही शकतो आणि वेळ पडल्यास एखाद्याला समजावूही शकतो.भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळेच टिकून आहे.
विस्तारवादामुळे जग चिंतेत
विस्तारवाद ही मानसिक विकृती आहे. 18 व्या शतकातील मागास विचार त्यातून दिसून येतो. या विचाराविरोधात भारत एक प्रखर आवाज बनत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेले असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी सतर्कता हाच आपल्या सुरक्षेचा मार्ग आहे.