प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटाशी डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या यांच्याप्रमाणेच अंगणवाडी कार्यकर्त्या अहोरात्र परिश्रम घेत असूनही त्यांच्या धडपडीची नोंद प्रशासनाने घेतली नाही. याबद्दल अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यांना जे काम देण्यात आले आहे, याची ऑर्डर कॉपी त्यांच्याकडे नसल्याने नागरिकांशी संपर्क साधण्यामध्ये त्यांना अडचणी येत आहेत.
वास्तविक कोरोनाबद्दल माहिती संग्रहित करण्यामध्ये अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सर्वांची माहिती संकलित करण्यासाठी त्यांनी वणवण केली आहे. कुटुंबातील कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का, बीपी, मधुमेह आहे का, कर्करोग किंवा तत्सम मोठा आजार आहे का, शस्त्रक्रिया झाली आहे का किंवा होणार असून पुढे ढकलण्यात आली आहे का, असा सर्व तपशील या अंगणवाडी शिक्षिकांना संकलित करून फॉर्ममध्ये नमूद करावा लागतो.
सर्वेक्षण पूर्ण होणे बंधनकारव
या शिक्षिका आणि साहाय्यिका यांना वेगवेगळे विभाग नेमून देण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळात त्या विभागामध्ये जाण्यासाठीची कोणतीही सुविधा त्यांच्यासाठी प्रशासनाने केलेली नाही. पोलीस त्यांना ठिकठिकाणी अडवितात. मात्र कोणत्याही परिस्थितीत तपशील आणि सर्वेक्षण पूर्ण होणे बंधनकारक असल्याने पोलिसांना विनंती करून त्या सर्वेक्षणासाठी जात आहेत.
पुन्हा फॉलोअप घेण्याच्या सूचना
शहर आणि ग्रामीण भागात मिळून तीन हजारहून अधिक अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्यांना ओळखपत्र आवश्यक असून ते अंजनेयनगर येथील सीडीपीओच्या कार्यालयातून घेऊन या, असे त्यांना सांगण्यात येते. परंतु तेथे जाणे सध्या केवळ अशक्मय आहे. प्रतिकूल परिस्थितीत अंगणवाडी शिक्षिकांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. मात्र आता 1 ते 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक विभागातील घराचा पुन्हा फॉलोअप घ्या, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे.
मात्र, हा फॉलोअप करताना फोनवरून संपर्क साधावयाचा झाल्यास फोन रिचार्जचे पैसे त्यांना दिले जात नाहीत. वाहनांची सुविधा नाही, त्यामुळे हे काम करावे कसे, असा त्यांचा प्रश्न पडला आहे. सरकारने आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य सेवकांसाठी विमा योजना जाहीर केली आहे. परंतु अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांसाठी कोणतीही सुरक्षा योजना सरकारने जाहीर केली नाही.
वास्तविक, संसर्ग होण्याची शक्मयता अंगणवाडी सेविकांना अधिक आहे. प्रत्येक परिसरात भ्रमंती करणे त्यांना भाग पडते. परंतु ना प्रशासनाने ना माध्यमांनी त्यांच्या कामाची नोंद घेतली. वास्तविक या पूर्वीसुद्धा सरकारच्या सर्व पद्धतीच्या सर्वेक्षणासाठी अंगणवाडी शिक्षिकांनी पुढाकार घेतला आहे. सरकार आमच्यावर कामाचा बोजा टाकते, परंतु नंतर मात्र आमच्या कामाची नोंद घेत नाही, असेही त्या म्हणतात.
सरकार नोंद घेत नसल्याची खंत
सर्वेक्षणाबरोबरच या शिक्षिकांनी घरोघरी जाऊन मुलांना आहाराचे वाटप केले आहे. अंगणवाडीसाठी आलेला धान्याचा कोटा अंगणवाडय़ा बंद झाल्याने उपयोगात आला नाही. मात्र आपण घरोघरी जाऊन मुलांपर्यंत हा आहार पोहोचवला आहे. गर्भवतींनासुद्धा पोषक आहार दिला आहे. तथापि, या कशाचीही नोंद सरकारने घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांकडून सहकार्य नाही
सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. मात्र, काही परिसरात नागरिकांनी स्वेच्छेने गल्ल्या बंद केल्या आहेत. दुसरीकडे अनेक चाळी व तत्सम ठिकाणी घरांच्या प्रवेशद्वारांना कुलूप घालण्यात आले आहेत. त्यामुळे आपण तपशील जमा करण्यासाठी आलो आहोत, हे सातत्याने सांगूनही नागरिक सहकार्य करत नाहीत.
सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी साहाय्यिकांची नकार नाही. परंतु किमान ओळखपत्र, येण्या-जाण्याची वाहनसुविधा आणि सुरक्षिततेची हमी एवढे तरी प्रशासनाने आणि शासनाने करावे, अशी त्यांची मागणी आहे.