वृत्तसंस्था /ढाका
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शुक्रवारी भारताची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारत हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. दुपारी 3 पासून या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून पाहता येणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताला या स्पर्धेत अपेक्षित सुरुवात करता आली नाही. कोरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दोन गोलांची आघाडी घेतली होती. पण कोरियाने भारताला 2-2 असे बरोबरीत रोखण्यात यश मिळविले होते. यानंतर दुसऱया सामन्यात बांगलादेशविरुद्ध मात्र भारताने शानदार प्रदर्शन करीत 9-0 असा एकतर्फी विजय मिळविला. स्ट्रायकर दिलप्रीत सिंगने हॅट्ट्रिक नोंदवताना तीनही मैदानी गोल केले. याशिवाय जर्मनप्रीतने पेनल्टी कॉर्नर्सवर दोन गोल नोंदवले. या सामन्यात पेनल्टी कॉर्नर्स घेताना भारताने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. थेट फटके न मारता हरमनप्रीत सिंग व वरुण कुमार यांनी त्यात व्हेरिएशनचा प्रयत्न केला. पाकविरुद्धही ते असाच प्रयोग करण्याची अपेक्षा आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशवर पूर्णपणे वर्चस्व राखले होते. हाच जोम व जोश शुक्रवारी पाकविरुद्धच्या सामन्यात कायम ठेवण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.
हरमनप्रीतने भारतीय बचावफळी उत्तम सांभाळली असून मिडफिल्डमध्ये कर्णधार मनप्रीत चोख भूमिका बजावत आहे. आतापर्यंतच्या सामन्यात आघाडीवीरांनी चांगले प्रदर्शन केले असून दोन सामन्यात ललित उपाध्यायने 3 गोल केले तर पुनरागमन करणाऱया आकाशदीप सिंगनेही आपल्या खात्यावर गोलची नोंद केली. असे असले तरी भारताला अजिबात गाफील राहून चालणार नाही. विशेषतः पाकिस्तानविरुद्ध. या संघाला हॉकीचा मोठा इतिहास आहे. मात्र अलीकडे त्यांची बरीच घसरण झाली आहे, हेही तितकेच खरे. ऑलिम्पिकमध्ये पाकने 3 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्यपदके मिळविली आहेत. पण टोकियो ऑलिम्पिकला त्यांना पात्रही ठरता आले नव्हते. त्यामुळे विश्व हॉकीमध्ये पुन्हा पाय रोवण्यासाठी त्या संघाचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 2018 मध्ये याआधीच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत व पाक यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे अंतिम लढत होऊ शकली नव्हती. त्यामुळे हा निर्णय त्यावेळी घेतला गेला होता.
मागील इतिहास पाहता पाकचे पारडे निश्चितच जड ठरते. मात्र अलीकडील या संघाचा फॉर्म पाहिल्यास भारतच या सामन्यात विजयाचा दावेदार असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत व पाकिस्तान हेच दोन्ही संघ विक्रमी सात वेळा अंतिम फेरीत एकमेकांसमोर आले आहेत. या दोन्ही संघांत एकूण 9 वेळा अंतिम फेरीत मुकाबला झाला असून त्यापैकी पाकने 7 तर भारताने दोनदा सुवर्णपदक मिळविले आहे. 1956 ते 1964 या कालावधीतील सलग तीन ऑलिम्पिकमध्ये याच दोन संघांत अंतिम लढत झाली होती, त्यापैकी दोनदा भारताने तर एकदा पाकने सुवर्ण मिळविले होते.
2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये साखळी फेरीत या दोन संघांची शेवटची लढत झाली होती. त्यात भारताने पाकवर 3-1 अशी मात केली होती. शुक्रवारी विजय मिळाल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल.