तिसऱया स्थानासाठी झालेल्या प्लेऑफमध्ये भारताची पाकवर 4-3 गोल्सनी मात
वृत्तसंस्था/ ढाका
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या भारताने येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही कांस्यपदक मिळविले. बुधवारी झालेल्या तिसऱया स्थानाच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमांचक सामन्यात 4-3 असा पराभव केला.
भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेचे विद्यमान विजेते होते. मस्कतमध्ये झालेल्या मागील स्पर्धेत दोन्ही संघांना पावसामुळे अंतिम लढत होऊ न शकल्याने संयुक्त विजेतेपद मिळाले होते. मात्र येथे भारताला उपांत्य फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेत्या जपानने 5-3 असा पराभवाचा धक्का दिला तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत कोरियाने 6-5 असे हरवित अंतिम फेरी गाठली होती.
कांस्यपदकाच्या प्लेऑफ लढतीत भारताने पहिल्याच मिनिटाला आघाडी घेतली. उपकर्णधार हरमनप्रीत सिंगने हा गोल नोंदवला. त्यानंतर सुमित (45 वे मिनिट), वरुण कुमार (53) व आकाशदीप सिंग (57) यांनी भारताचे उर्वरित गोल नोंदवले. पाकिस्तानतर्फे अफराज (10 वे मिनिट), अब्दुल राणा (33), अहमद नदीम (57) यांनी गोल केले. या स्पर्धेत भारताने पाकवर मिळविलेला हा दुसरा विजय आहे. राऊंडरॉबिन फेरीतही भारताने पाकवर 3-1 असा विजय मिळविला होता.
भारताने या सामन्यात प्रारंभापासूनच पाकिस्तानी बचावफळीला दडपणात ठेवले. आधीच्या सामन्यात जपानने भारताविरुद्ध जसा खेळ केला, तसे धोरण आज भारताने ठेवले आणि सुरुवातीलाच पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. यातील शेवटच्या कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने जोरदार फ्लिकवर गोल नोंदवून भारताला पहिल्या मिनिटाला आघाडीवर नेले. भारताने पाक हद्दीत अनेकदा चढाया केल्या. पण त्यांना त्यांचा बचाव भेदता आला नाही. सामना पुढे सरकेल तसे पाकचा आत्मविश्वासही वाढत गेला आणि दहाव्या मिनिटाला त्यांनी गोल नोंदवून बरोबरीही साधली. हरमनप्रीतने सर्कलमध्ये चेंडू क्लीअर करताना चूक केली आणि त्याचा लाभ अफराजने घेत हा गोल नोंदवला.
भारतानेही लगेचच पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण यावेळी पाक गोलरक्षकाने अचूक बचाव केला. 14 व्या मिनिटाला पाकला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण बहादूर पाठकने त्यावर अप्रतिम बचाव केला. दुसऱया सत्रात दोन्ही संघांत चांगला संघर्ष पहावयास मिळाला. पाकने उत्तम बचाव करीत भारताचे काही प्रयत्न फोल ठरविले तर 22 व्या मिनिटाला भारताने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण पाक गोलरक्षक अमजद अलीने उत्तम बचाव केल्याने ही संधी वाया गेली. मध्यंतरापर्यंत त्याने आकाशदीप, जर्मनप्रीत सिंग यांचे प्रयत्न फोल ठरवले. मध्यंतराच्या सुमारास भारताने आठवा पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण सदोष फिनिशिंगमुळे तो वाया गेला. उत्तरार्धात सुमित, वरुण कुमार व आकाशदीप सिंग यांनी भारताचे आणखी तीन गोल केले तर पाकतर्फे अब्दुल राणा व अहमद नदीम यांनी गोलांची भर घातली.