वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे पॅरा क्रीडापटू बहरीनमधील आशियाई युवा पॅरा क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मायदेशी परतले असून या क्रीडापटूंनी तब्बल 41 पदके पटकावत आजवरची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
रिफा सिटी येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 12 सुवर्ण, 15 रौप्य, 14 कांस्यपदके मिळविली. यापैकी पॅरा ऍथलेट्सनी सर्वाधिक 22 पदके भारताला मिळवून दिली. त्यात 8 सुवर्ण, 6 रौप्य व 8 कांस्यपदकांचा समावेश आहे. पॅरा बॅडमिंटनपटूंनी 15 पदके पटकावली असून टोकियो पॅरालिम्पियन पलक कोहली, संजना कुमारी, हार्दिक मक्कर यांनी प्रत्येकी तीन पदके मिळविली. जलतरण या क्रीडाप्रकारात एक रौप्य व दोन कांस्यसह एकूण तीन पदके मिळविली. याशिवाय पॉवरलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात भारताने एक रौप्य घेतले.
30 देशांतील 700 हून अधिक पॅरा खेळाडूंनी यात भाग घेतला होता. 6 डिसेंबरला समाप्त झालेल्या या स्पर्धेत पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, बोक्सिया, गोलबॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, पॅरा स्विमिंग, पॅरा टेबल टेनिस, पॅरा तायक्वांदो, व्हीलचेअर बास्केटबॉल या नऊ क्रीडाप्रकारांत खेळाडूंनी भाग घेतला होता.