वृत्तसंस्था/ बँकॉक
पुढील आठवडय़ात चीनमधील वुहानमध्ये होणारी आशियाई मिश्र सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धा रद्द करण्यात आली असल्याचे बॅडमिंटन आशियाने बुधवारी जाहीर केले. अनेक देशांनी प्रवासाचे कडक निर्बंध घातले असल्याने तसेच क्वारंटाईनच्या विविध अटींमुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑलिम्पिकसाठी ही पात्रतेची स्पर्धा नसल्याने तसेच स्पर्धा आयोजित करण्याची अयोग्य वेळ, ही कारणेही या निर्णयाला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘कोव्हिड 19 चा प्रकोप अद्याप ओसरला नसल्याने अनेक आशियाई देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर कडक निर्बंध घातले आहेत. याशिवाय क्वारंटाईनचीही प्रत्येक देशाने सक्ती केलेली आहे,’ असे बॅडमिंटन आशियाने निवेदनात म्हटले आहे. ‘आशियातील दोन टप्पे व वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा 12 ते 31 जानेवारी या कालावधीत थायलंडमधील बँकॉकमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना तेथून परतल्यानंतर दोन आठवडय़ासाठी सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यामुळे लगेचच असलेल्या कुठल्याही स्पर्धेत ते भाग घेऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट आहे. कारण स्पर्धा आयोजित करणारा देशही क्वारंटाईनमध्ये राहण्याची अट घालत असतो. या बाबी लक्षात घेत आम्ही आशियाई स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.
मिश्र सांघिक स्पर्धेतून खेळाडूंना यावर्षीच्या सुदिरमन चषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविता येणार होती. एखादी खंडीय पात्रता स्पर्धा आयोजित करता आली नाही तर संघांचे जागतिक मानांकन विचारात घेऊन त्यांना विभागीय (खंड) कॉन्फेडरेशन्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाईल, असे विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) कळविले असल्याचे बॅडमिंटन आशियाने सांगितले.