मागील कामगिरीत सुधारणा करण्याची भारतीय बॉक्सर्सकडून अपेक्षा,
वृत्तसंस्था/ दुबई
आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपला सोमवारपासून येथे सुरुवात होत असून भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिक तयारी कितपत झाली आहे, याची चाचपणी या स्पर्धेतून करता येणार आहे. भारताने या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत विक्रमी पदके मिळविली होती, त्या कामगिरीत सुधारणा करण्याचे ध्येय यावेळी भारतीय बॉक्सर्सचे असणार आहे.
9 पुरुष व 10 महिला असे एकूण 19 भारतीय बॉक्सर्स या स्पर्धेत सहभागी होत असून प्रत्येक जण अव्वल यश मिळविण्याचाच प्रयत्न करणार आहे. वेशेष म्हणजे अभूतपूर्व बक्षीस रकमेचा बोनसही त्यांना यावेळी मिळणार आहे. थोडय़ाशा अडचणीनंतर भारतीय पथक शनिवारी येथे दाखल झाले. प्रवासास विलंब आणि कागदपत्रांच्या मंजुरीचा घोळ यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली होती. त्यातच भरीस भर म्हणून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविणारा विनोद तन्वर (49 किलो गट) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. एकंदरच भारताची ऑलिम्पिक तयारी कशा प्रकारे होत आहे, हे या घडामेडीवरूनच स्पष्ट होत आहे. कोव्हिड 19 मुळे अनेकदा त्यांना ट्रेनिंगपासून वंचित रहावे लागले आहे.
‘आमच्याकडून ऑलिम्पिकची तयारी कितपत झाली आहे, ते या स्पर्धेत आजमावून पाहता येणार आहे. काही त्रुटी आढळल्यास त्यावर पुढे काम करता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही या स्पर्धेकडे पाहत आहोत,’ असे भारतीय बॉक्सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सांतियागो नीव्हा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. 2019 मधील मागील आवृत्ती थायलंडमध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेत भारताने आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन करीत एकूण 13 पदके पटकावली होती. त्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य व 7 कांस्यपदकांचा समावेश होता. त्यामुळे यावेळीही त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ‘आम्ही नेहमी जिंकण्यासाठीच येतो. पण स्पर्धा अवघड असल्याने अपेक्षित यश मिळविणे सोपे नसते. कारण अनेक देशांनी ऑलिम्पिक पात्र झालेले आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदके मिळविलेले बॉक्सर्स यात उतरले आहेत. असे असले तरी आमचे खेळाडू उत्तम कामगिरी करतील आणि अपेक्षित यश मिळवतील, याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो,’ असेही नीव्हा म्हणाले.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंतील विद्यमान विजेता अमित पांघल (52 किलो गट), मागील स्पर्धेत रौप्य मिळविलेला आशिष कुमार (75 किलो), माजी पदकविजेता विकास कृष्णन (69 किलो) हे या स्पर्धेत भारताचे पुरुष विभागातील प्रमुख आव्हानवीर असतील. महिलांमध्ये सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमने या स्पर्धेत आजवर पाच सुवर्णपदके पटकावली आहेत. याशिवाय सिमरनजित कौर (60 किलो), लवलिना बोर्गोहेन (69 किलो) आणि विद्यमान विजेती पूजा रानी (75 किलो) या भारताच्या पदकाच्या दावेदार आहेत. या चौघीही टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. याशिवाय चार वेळा पदक मिळविणारा शिवा थापा (64 किलो गट) सलग पाचव्यांदा पदक मिळविण्याचे ध्येय बाळगून आहे. त्याने 2013 मध्ये सुवर्ण, 2017 मध्ये रौप्य, 2015 व 2019 मध्ये एकेक कांस्यपदक मिळविले आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने या स्पर्धेसाठी 4 लाख अमेरिकन डॉलर्सचा बक्षीस निधी देण्याची घोषणा केली आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा भारतात नवी दिल्लीत होणार होती. पण कोरोना महामारीच्या उदेकामुळे ही स्पर्धा दुबईत हलविण्यात आली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱयाला 10,000 डॉलर्स बक्षीस दिले जाणार आहे तर रौप्यविजेत्याला 5000 आणि कांस्यविजेत्याला प्रत्येकी 2500 डॉलर्स बक्षीस दिले जाणार आहे.
भारताव्यतिरिक्त इंडोनेशिया, इराण, कझाकस्तान, दक्षिण कोरिया, किर्गीजस्तान, फिलिपिन्स, उझ्बेकिस्तान या प्रमुख देशांच्या नामवंत बॉक्सर्सनीही या खंडविभागीय स्पर्धेत भाग घेतला आहे. यापैकी कझाकचा संघ सर्वात बलाढय़ व इतर स्पर्धकांसाठी धोकादायक वाटत असून त्यात वर्ल्ड पदकविजेते साकेन बिबोसीनोव्ह (52 किलो गट), व्हॅसिली लेविट (91 किलो), कामशायबेक कुनकाबायेव्ह (91 किलोवरील) यांचा पुरुष विभागात तर महिला विभागात वर्ल्ड चॅम्पियन्स नाझीम कीझायबे (51 किलो गट), दिना झोलामन (54 किलो), व्हॅलेन्टिना खाल्झोव्हा(69 किलो), लॅझात कुनगेईबायेव्हा (81 किलोवरील) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय खेळाडू ः पुरुष-अमित पांघल, मोहम्मद हुसामुद्दिन, वरिंदर सिंग, शिवा थापा, विकास कृष्णन, आशिष कुमार, सुमित सांगवान, संजीत, नरेंदर. महिला-मोनिका, एमसी मेरी कोम, साक्षी, जस्मिन, सिमरनजित कौर, लालबुआतसैही, लवलिना बोर्गोहेन, पूजा रानी, सवीती, अनुपमा.