वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये येत्या नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान होणारी आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे सरचिटणीस जय कोवली यांनी मंगळवारी दिली.
सोमवारी ऑनलाईन माध्यमातून झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध कॉन्फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कोरोना महामारी परिस्थितीमुळे आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. आता ही स्पर्धा 2021 साली घेतली जाणार असून भारताकडेच यजमानपद कायम राहिल. 1980 साली मुंबईत पुरूषांची आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा यापूर्वी झाली होती. तसेच महिलांची आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा हिसारमध्ये 2003 साली घेण्यात आली होती. गेल्या वर्षापासून पुरूष आणि महिलांची एकत्रित स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोना महामारी समस्येमुळे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा वेळापत्रक संपूर्ण कोलमडले असून टोकियो ऑलिम्पिक आणि आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोरोना महामारीने देशातील सुमारे 25 लाख लोकांना कोरानाची बाधा झाली असून मृतांचा आकडा 50 हजार झाला आहे. पतियाळातील साईच्या केंद्रामध्ये सध्या भारतीय मुष्टियोद्धय़ांसाठी सराव शिबीर सुरळीत सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे 5 पुरूष आणि 4 महिला मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत.