वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी भारतीय तिरंदाजी संघामध्ये उत्तरप्रदेशचा तिरंदाजपटू नीरज चौहानने स्थान मिळविले आहे. गेल्या जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत आर्थिक समस्येला नीरजला सामोरे जावे लागले होते. दरम्यान क्रेंद्रीय क्रीडा युवजन खात्यातर्फे त्याला आर्थिक मदत देण्यात आली होती.
आगामी होणाऱया आशियाई क्रीडास्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा सध्या सुरू असून नीरज चौहानने पहिल्या तीन क्रमांकात आपले स्थान मिळवित भारतीय संघात प्रवेश मिळविला आहे. चालू वर्षीच्या अखेरीस होणाऱया चार विश्वचषक तिरंदाजी तसेच विश्व क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय संघाचे नीरज प्रतिनिधीत्व करणार आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते आणि नीरजच्या वडिलांना आपली नोकरी गमवावी लागली होती. अचानक या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. अशा कठीण परिस्थितीत नीरजच्या कुटूंबियानी भाजीपाला विक्री करत आपला उदरनिर्वाह केला होता. सोनेपतच्या साई केंद्रामध्ये सध्या आगामी आशियाई, विश्व व विश्वचषक स्पर्धांसाठी निवड चाचणीचा दुसरा टप्पा चालू आहे. रिकर्व्ह प्रकारातील टप्पा 27 मार्चला संपुष्टात आला तर कंपाऊंड प्रकारातील निवड चाचणीचा टप्पा 30 मार्चला संपणार आहे.