वृत्तसंस्था/ कराची
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेसाठी भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर येत्या जूनमध्ये खेळविली जाणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकावी लागेल, असे प्रतिपादन पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी केले आहे.
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्यावर्षी खेळविली जाणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. दरम्यान येत्या जूनमध्ये आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर खेळविला जाणार आहे. दरम्यान जूनमध्ये होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी लंकेचे प्रयत्न चालू आहेत. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पाकच्या खेळाडूंना व्हिसा संदर्भात भारताकडून ग्वाही देण्याची मागणी पीसीबीने केली आहे. या स्पर्धेसाठी पाकच्या शौकिंनाना तसेच प्रसार माध्यमातील व्यक्तींना भारतीय शासनाकडून व्हिसाची मागणी पाकतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय शासनाने ही मागणी फेटाळली तर टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा त्रयस्त ठिकाणी भरविण्याची मागणी पीसीबीकडून आयसीसीकडे केली जाण्याची शक्यता आहे.