वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्यास पीसीबीसमोर कोणतीच अडचण नसल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. तथापि ही स्पर्धा पाकमध्ये खेळविली गेली तर भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे.
भारतीय संघ क्रिकेटचे सामने खेळण्यास पाकमध्ये जाणार नाही. दरम्यान आशिया चषक स्पर्धेत आशिया खंडातील भारत वगळता इतर अव्वल संघ सहभागी होतील. भारतीय संघ पाकबरोबर त्रयस्थ ठिकाणी क्रिकेटचा सामना खेळण्याचा विचार करेल, असेही बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकमध्ये होणाऱया आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने आपला सहभाग दर्शवावा असे पीसीबीला वाटते. तब्बल दशकानंतर लंकेचा संघ पाकमध्ये मालिका खेळत आहे. बांगलादेश संघाने अलिकडेच पाकचा दौरा केला आहे. तथापि विदेशातील संघांनी पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी बिनधास्त यावे, असे आवाहन पीसीबीने केले आहे.