देशभर प्रकाश उत्सवाची अर्थात दिवाळीची चाहूल लागली असताना कोरोनाच्या काळय़ाकुट्ट अंधारावर मात करत प्रकाशाच्या पणत्या चमचमताना दिसत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱयावर आहेत. कोरोनाचा पूर्ण नाश झालेला नाही. पण कोरोनावर भारतीय लस प्रभावी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या टीमने हवामान बदलाचे संकट, आरोग्य संवर्धन व स्वच्छ भारत वगैरे गोष्टींवर भर दिला आहे. देशाची अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी आणि बेरोजगारीवर मात करुन सर्वांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निसर्गाचा ऱहास व तापमानातील वाढ हा चिंतेचा विषय आहे. अलीकडच्या काही वर्षात यांचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. तापमानाचा पारा काही ठिकाणी 45 ते 48-50 असा चढता नोंदवला गेला आहे. गेली पाच वर्षे तापमान सातत्याने वाढत आहे. ढगफूटी, महापूर, दुष्काळ असे तडाख्या मागून तडाखे बसत आहेत. समुद्राची पाणी पातळी काही ठिकाणी वाढते आहे. समुद्रकाठची काही शहरे अडचणीत आहेत. वाढत्या तापमानामुळे जैविक साखळीही अडचणीत आहे. पीकपाणी, प्राणीमात्र, मनुष्य, जंगल अशा अनेक गोष्टी अडचणीत आहेत. भारतात यंदा पाऊस चांगला झाला. दुष्काळ पडला नाही, पडणार नाही पण ढगफुटी, महापूर यांचे तडाखे बसले, बसत आहेत. परतीचा पाऊसही, काही ठिकाणी विध्वंसकारी झाला आाहे. हवामान, पर्यावरण यांचे रक्षण केले पाहिजे, असे वारंवार सांगितले जाते. त्यासाठी योजना आखल्या जातात. निधी ओतला जातो. पण अपेक्षित परिणाम दिसत नाही. झाडे लावा, झाडे जगवा, एक मूल, एक वृक्ष वगैरे म्हटले जाते. प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण, निसर्ग रक्षण साकारले जात नाही. दरवर्षी तोच खड्डा, तेच झाड असे अव्याहतपणे सुरु आहे. त्याचे फटके बसत आहेत. पेट्रोल, डिझेलचा अति वापर, कार्बन उत्सर्जन यामुळे समस्या वाढते आहे. हिमवृष्टी, भूस्खलनाचे नवे संकट उभे ठाकते आहे. शहरात घरादारात-वस्त्यात रस्त्यावर पाण्याचा तळ, मुंबईची तुंबई आता नित्याचे झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर ही समस्या चिंतेची बनली आहे. हवामान बदलाच्या संकटावर जगातील नेते एकत्रित येणार आहेत. ग्लासगो येथे यंदाची जागतिक हवामान परिषद भरली आहे. नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत हवामान, तापमान या विषयावर जग एकवटणार असे दिसते आहे. ग्लासगो येथे संयुक्त राष्ट्राची ही 26 वी परिषद कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी निर्धाराने पावले टाकेल. त्यासाठीचा कार्यक्रम ठरवेल असे दिसते आहे. हवामानावर होणाऱया दुष्परिणामांना तुम्ही-आम्ही सारे मानवच जबाबदार आहोत हे वेगळे सांगायला नको. शास्त्रज्ञांनी नुकताच सादर केलेला एक अहवाल हेच नमूद करतो. या अहवालात समुद्राची पातळी या शतकाच्या अखेरीस दोन मीटरने वाढेल असे म्हटले आहे. या अहवालात हवामान बदलाच्या विज्ञानाचे व्यापक विश्लेषण करण्यात आले आहे. हा अहवाल मानवतेसाठी धोक्याची घंटा आहे. विश्वातील सर्व मानव एकत्र आले आणि निर्धाराने त्यांनी काम केले तरच ही आपत्ती थोपवता येईल. पण, यासाठी यापूर्वीच काम सुरु व्हायला हवे होते. आता किंचितही उशीर धोकादायक होईल. शास्त्रज्ञांनी ग्रीक आणि उत्तर अमेरिकेत झालेल्या उष्णतेच्या झळा, जर्मनी आणि चीनमध्ये आलेले पूर याचे दाखले दिले आहेत. उष्णतेची तीव्रता वाढते आहे आणि थंडी कमी होते आहे. याचे मानव जातीवर गंभीर परिणाम अटळ आहेत. तापमान वाढ रोखली नाही तर दुष्काळ, महापूर अटळ आहेत. या विषयात तसे नवे काही नाही. कृती कशी व कोण केव्हापासून करणार हे महत्वाचे आहे. या संदर्भात पॅरिसमध्ये जी परिषद झाली त्यात एक करार करण्यात आला. पॅरीस करार म्हणून तो प्रसिद्ध आहे. जगभरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हाच पॅरिस कराराचा मुख्य उद्देश आहे. तथाकथित श्रीमंत प्रगत राष्ट्रे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अशीच राष्ट्रे पर्यावरण, हवामान, तापमान व मानवी जीवन यांच्या मुळावर उठली आहेत. या देशांनी कार्बन उत्सर्जन रोखावे आणि गरीब राष्ट्रांना कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी निधी द्यावा अशीही अपेक्षा आहे. आपल्याकडे नितीन गडकरी, पेट्रोल व डिझेल पंप बंद करण्याची भाषा करत आहेत. इथेनॉल व ग्रीन एनर्जीसाठी धोरण आखत आहेत. इलेक्ट्रीक वाहने आणली जात आहेत. काळाची ती गरज झाली आहे. ग्लासगो हे स्कॉटलंडमधील मोठे शहर आहे. तेथे पंधरा दिवस या जागतिक समस्येवर चिंतन-मनन होईल, जगभराची तापमान, हवामान, पर्यावरण यांची छाननी होईल व हवामान बदलाच्या संकटावर अवघे जग एक दिलाने, एक मनाने वज्रमूठ आवळेल. भारतही हवामान बदल, तापमान वाढ यामुळे त्रस्त आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विषयात लक्ष घातले आहे. ग्रीन हाऊस मधून होणारे गॅस उत्सर्जन ही समस्या आहे. या समस्येत अमेरिका सर्वात जास्त दोषी आहे. पाठोपाठ ब्राझील, चीन, भारत, जर्मनीचा समावेश आहे. मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडन, फ्रान्सचे राष्ट्रपती एमैनुअल मैक्रो, ब्रिटनचे बोरिक जॉन्सन, कॅनडाचे पंतप्रधान जार्सन टुडो यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी या प्रश्नावर सखोल चर्चा, मंथन व अभ्यास केला आहे. ग्लासगो परिषदेतून काही चांगले ठोस ठरेल आणि विश्वभर त्यांची अंमलबजावणी होईल, नव्हे व्हावी त्यातच माणसांचे, मानवतेचे हित आहे. अन्थथा आगामी काळ अवघड आहे. जग तारणारा, मानवहित साधणारा मंत्र आणि कार्यक्रम ग्लासगो परिषदेतून मिळावा अशी अपेक्षा आहे आणि ती सार्थ आहे.
Previous Articleएलओसीवर भूसुरुंगाचा स्फोट, दोन जण हुतात्मा
Next Article शॉक लागून पतीचा मृत्यू पत्नीसह दोन मुले गंभीर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.