अध्याय आठवा
आशा निराशेच्या खेळाला मनुष्य कंटाळतो आणि आपल्या मनासारखे कधी ना कधीतरी घडेल या आशेवर जगण्यातला फोलपणा त्याच्या लक्षात येतो. जरी मनुष्य आशेवर जगत असला तरी शेवटी बहुतेकवेळा निराशाच पदरी येते. पिंगलेचे तसेच झाले. कुणीतरी येईल आणि आपल्याला सुख आणि पैसा देईल या आशेवर आयुष्य काढणाऱया व्यवसायात बिचारी जीवन व्यतीत करत होती पण शेवटी असा एक क्षण आला की तिला उपरती झाली आणि नारायण हाच आपला खरा त्राता आहे हे तिच्या लक्षात आले. कितीही नीच कर्म मनुष्य करत असला तरी भगवंतकृपेने ज्याला उपरती होते त्याचा नक्की उद्धार होतो हेच नाथांना येथे अधोरेखित करायचे आहे. तिच्या मनात आलेले विचार जरी तिच्या व्यवसायाशी निगडित असले तरी अत्यंत चिंतनीय आहेत म्हणून नाथांनी ते सविस्तर मांडले आहेत. ती पुढे म्हणते, पूर्वजन्मी तरी माझ्या हातून असे काय घडले असेल की ‘पतित पावन असलेल्या कृपाळू जनार्दनाच्या कृपेने मला उपरती झाली. व्यवसायाने बघितले तर मी पूर्ण पतित स्त्री, पण तो जगन्नाथ ‘पतितपावन’ असल्याने त्याने कृपा करून मला विवेकयुक्त वैरागी केले. आता मी भगवंतांचे हे उपकार स्मरून, विषयभोगांची इच्छा टाकून देऊन जगदीश्वरांना शरण जाते. कारण हृदयस्थ अच्युताला टाकून इतर कपाळ करंटय़ांना पती करावे, तर ते सर्व मृत्यूच्या भयाने भिऊन गेलेले, सदोदित काळग्रस्त असे आहेत. तेच सदानकदा भयाने कष्टी झालेले असल्याने पत्नीला काय सुख देणार? सारीच काळाच्या जबडय़ात सापडलेली! या लोकात सुख देणारा कोणीच दिसत नाही. हा सगळा विचार केल्यावर माझा निर्णय झाला आसक्ती संपली आणि अच्युत सुखाची, अक्षय्य हरिसुखाची गोडी लागली. हे सुख भोगू लागले असता क्षणोक्षणी त्यात वाढ होत जाते. सर्व प्राण्यांचे हित करणारे, माझे प्रियतम स्वामी आहेत. आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि त्यांनाच परमानंदाने मिठी मारून लक्ष्मीप्रमाणे त्यांच्याबरोबर विहार करीन. लक्ष्मी पायांची दासी झालेली आहे. पण मी त्याला-सर्वकाळी, सर्वदेशी, सर्वरूपी, सर्वस्वेकरून स्वतंत्रपणेच भोगीन.
आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन. तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन. तो कृपाळु स्वामी श्रीहरि संसारसागरात तारक आहे. इच्छांची उसळी जबर असते! ती जीवाची फार तारांबळ उडवते. अपुऱया इच्छा क्रोधाला इंधन पुरवतात आणि ज्ञानाला झाकून टाकतात. ज्याप्रमाणे सापाचे विष चढलेल्या माणसाला गूळ कडू लागतो आणि तो कडूलिंब गोड म्हणून खाऊ लागतो तसे प्रापंचिकांना विषय गोड वाटतो. प्रत्यक्षात परमार्थ हा अमृतासारखा गोड, पण विषयीजनांना कडू लागतो! जर अंगात निखालस दृढ वैराग्य बाणले तर आपणच आपला उद्धारकर्ता होतो. दृढ वैराग्य आले की, गाढ झोपी गेलेल्यापाशी रंभा आली असताही तो निर्विकार असतो, त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही! असे दृढ वैराग्य कशाने प्राप्त होईल? जो हे लक्षात घेईल की, जगाला सर्व बाजूंनी काळाने ग्रासले आहे, त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटत नाही. बाप आजे काळ घेऊन गेला, पुत्र व नातू काळाने गट्ट केले, त्याला निश्चित वैराग्य येईल कारण त्याला कोणत्याच गोष्टीची अभिलाषा वाटणार नाही. स्वात्मबुद्धीने विचार करून, आधिव्याधी व दुर्वासना पिंगलेने पार छाटून टाकल्या नित्यसिद्ध असलेल्या हृदयस्थ कांताचा आश्रय घेताच तिच्या चित्तातले विकल्प नाहीसे होऊन ती त्याच्याशी एकरूप झाली. खरोखर आशा न बाळगणे हेच सर्वात मोठे सुख आहे. आशेमुळे आसक्ती, दीनता, ममता आणि अधर्म जोर करतात. ज्याची आशा निःशेषपणे नाहीशी झाली त्याच्या पायी ब्रह्मदेव लागतात. अष्टसिद्धी त्याच्या दासी होऊन राहतात.