आषाढी वारी पालखी सोहळाबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक
पंढरपूर / प्रतिनिधी
यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळाबाबतचे सर्व पर्याय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर होणार आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वारकऱ्यांची भूमिका मांडून निर्णय जाहीर करतील. अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे सोहळाप्रमुख ह.भ.प. विशाल महाराज मोरे यांनी दिली. प्रसंगी या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारी बाबत सकारात्मक दिसून आले.
आषाढी यात्रा पालखी सोहळा बाबत पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आळंदी आणि देहू संस्थानच्या विश्वस्तांनी कडून पालखी सोहळा बाबतचे अनेक पर्याय देखील उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले. आता हे सर्व पर्याय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर केले जाणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आषाढी पालखी सोहळ्याबाबतच्या शिफारशीच्या अनुषंगाने पालखी सोहळ्याबाबतच्या निर्णयअंती सरकार पोहोचणार आहे. यानंतरच यंदाच्या आषाढी पालखी सोहळाबाबतचा निर्णय 29 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करतील, असे आजच्या पुणे येथील बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. या बैठकीमध्ये देहू आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी ‘सरकार ज्या स्वरुपात पालखी सोहळ्यास परवानगी देईल’ तेच स्वरूप सर्वांना मान्य असणार आहे. सरकारच्या विरोधात कुठलीही भूमिका वारकरी घेणार नाहीत, असेही या बैठकीमध्ये आळंदी आळंदी व देहू संस्थानच्या विश्वस्तांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये , सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , पुणे विभागीय आयुक्त , तसेच पुणे सोलापूर आणि सातारा येथील जिल्हाधिकारी, आळंदी आणि देहू संस्थानचे विश्वस्त, पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष, कार्यकारी अधिकारी आदी या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.