प्रतिनिधी / पंढरपूर
आषाढी कार्तिकी विसरू नका मज / सांगतसे गुज पांडुरंग
वारकरी भक्तांनी आषाढी आणि कार्तिकी विसरू नका, असे खुद्द पांडुरंग सांगतात. अशा आशयाचा संत नामदेवरायांचा अभंग आहे. त्यामुळे सांप्रदायात आषाढीनंतर कार्तिकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या निर्बंधातच आषाढीनंतर कार्तिकी वारी होणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनाकडून ‘वारी’ संदर्भातील भूमिका जाहीर होणे अपेक्षित आहे.
आषाढी आणि कार्तिकी वारी ही वारकरी, विठ्ठल भक्तांसाठीची एक पर्वणी असते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढी एकादशी समयी कोरोनाचा हाहाकार होता. अशात आषाढी यात्रा निर्मनुष्य झाली. संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरला अवघ्या 36 तासांसाठी आल्या. यानंतर वारकरी भक्तांना यंदा कार्तिकी यात्रा तरी अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याचे कोरोना महामारीचे वातावरण पाहिले, तर निश्चितच यंदा कार्तिकीवरही निर्बंध येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कार्तिकी यात्रेसंदर्भात नुकतेच वारकरी सांप्रदायाचे एक शिष्टमंडळ प्रांताधिकारी सचिन ढोले आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना भेटले आणि कार्तिकी संदर्भात शासनाने कुठली भूमिका घेतली आहे, यांची विचारणा करीत वारकरी सांप्रदायाला वारीचे नियोजन करायचे आहे. याबाबतची भूमिका विषद केली. पण अधिकाऱयांनी याबाबत राज्य शासनाकडून योग्य ते निर्देश येतील असे सुतोवाच केले.
कार्तिकी यात्रेस प्रामुख्याने कोकण, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव या परिसरातील वारकरी येतात. मात्र यंदा आषाढी न झाल्याने राज्यभरातून नागरिक येऊ शकतात. मात्र, यंदाची परिस्थिती विचारात घेतल्यास या सोहळ्याला कोरोनाच्या निर्बंधामुळे नवे रूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.