प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाने यंदा अनेकांची पंढरीची वारी चुकविली. पंढरपूरला जाता आले नाही तरी वारकरी आणि विठुरायाचे लाडके भक्त आपल्या घरी साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करणार आहेत. आषाढीच्या निमित्ताने दरवषी विठ्ठल मंदिरांना नवा साज चढविला जातो. परंतु सामाजिक अंतर पाळणे महत्त्वाचे असल्याने दक्षता म्हणून यंदा प्रथमच आषाढीला विठ्ठल मंदिरे बंद राहणार आहेत.
ज्याच्या मनात भक्ती आहे, त्याला विठू अनेक रुपाने भेटतोच, अशी भाविकांची धारणा असल्याने शहरात आषाढीची तयारी सुरू आहे. घरातील विठुरायाची पूजाअर्चा करून आषाढी साजरी होईल. आषाढीनिमित्त बाजारपेठेत साबुदाणा, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा, बटाटे आणि फळफळावळे यांची आवक वाढली आहे.
साबुदाण्याचा दर 70 ते 80 रुपये, कच्चा शेंगदाणा 100 रुपये, भाजलेला शेंगदाणा 110 ते 120 रुपये, वरीचे तांदूळ 90 रुपये किलो असा दर आहे. गूळ 45 ते 50 रुपये किलो आहे. यंदा बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. आंबा अजून उपलब्ध असून त्याचबरोबर फणस, अननस, डाळींब, पेरू, केळी, सफरचंद यांची विक्रीही सुरू आहे. मंगळवारी पावसाची रिमझिम सुरू राहिली तरीसुद्धा खरेदीही रात्रीपर्यंत सुरू होती.