पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना, वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने दिलेले निर्देश आणि परंपरा यांचा समन्वय साधून आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा. यासाठी सर्व विभागांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे बैठक झाली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे,
प्रांताधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आदी उपस्थित होते.
सुरवातीला ढोले यांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालखी सोहळे यांचे आगमन, शासकीय महापूजा, नगरप्रदक्षिणा आदीबाबतचे नियोजन सांगितले. भरणे यांनी सर्व संबधित विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱया आणि कामकाज याबाबत पुढाकार घेऊन काम करावे. कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास जिल्हा प्रशासन व मंदिर समिती यांच्याशी समन्वय ठेवून तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुद्ध पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. भरणे यांनी केल्या. यावेळी त्यांनी काही प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, राज्य उत्पादन शुल्कचे रवींद्र आवळे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.