प्रतिनिधी/ म्हापसा
वोळांतöआसगाव बार्देश येथी आंबे, किनळ, सागवान आदी मिळून सुमारे 70 भली मोठी येथील झाडे कापून त्याजागी दिल्ली येथील एका इसमाचा इमारत उभारण्याचा डाव असल्याचे उघड झाले आहे. या झाडांची कत्तल करण्यास समाज कार्यकर्ते चंदन मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर नगर गावातील नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविला असून वन मंत्री विश्वजित राणे यांनी याची दखल घेण्याची मागणी केली आहे.
झाडे कापण्यासाठी येथील प्रत्येक झाडावर कत्तल करण्यासाठी नंबर घातले आहे. आसगाव हा पक्षांचे गाव म्हणून ओळख आहे. सदर झाडांची कत्तल करण्यास तीव्र विरोध करण्याचा निर्धार स्थानिक नागरिकांनी केला आहे.
भोगोलिकदृष्टय़ा अत्यंत छोटासा आणि निसर्ग संपन्न असलेल्या येथील आसगांवात गेल्या 10 ते 15 वर्षांत मोठमोठय़ा रहिवासी वसाहती तसेच दिल्लीवाल्यांनी काँक्रिटचे निवासी बंगले उभारून आधीच येथील पर्यावरण तसेच जैवसंवर्धनाची मोठय़ा प्रमाणात हानी केली आहे. त्यातच वोळांत येथील सर्वे क्र. 176/16 येथील खासगी जागेतील आंब्याची फळे देणारी शेकडो झाडे कत्तल करण्यासाठी अज्ञातांकडून मोजमाप करून क्रमांकित करण्यात आल्याचे दृष्टीस पडल्याची माहिती यावेळी मांद्रेकर यांनी दिली.
दरम्यान, स्थानिक अशोक बांदोडकर यांनी परप्रांतीय बिल्डर लॉबीकडून स्थानिकांना विश्वासात न घेता तसेच येथील नैसर्गिक संपत्तीची हानी करीत शेकडो वर्षे जुन्या विविध प्रकारच्या झाडांची होणारी कत्तल स्थानिक कदापि सहन करणार नसल्याचे सांगितले. झाडांची कत्तल रोखण्यासाठी वेळप्रसंगी चंदन मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्याचाही इशारा यावेळी ज्येष्ठ नागरिक मान्युअल ब्रागांझा तसेच अशोक बांदोडकर यांनी यावेळी दिला.
अज्ञात बिल्डरकडून याभागात होऊ घातलेल्या शेकडो झाडांच्या कत्तलीवरून सामाजिक कार्यकर्ते चंदन मांद्रेकर तसेच ग्रामस्थांकडून उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग खाते तसेच स्थानिक हणजूणच्या पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची वनमंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.