पेट्रोल-डिझेल खरेदीचे प्रमाण निश्चित – आवश्यक सामग्रीची कमतरता
वृत्तसंस्था / आइझोल
आसाम आणि मिझोरामदरम्यान मागील आठवडय़ात झालेल्या हिंसक झटापटीपासून तणाव सुरू आहे. आसामच्या अनेक सीमावर्ती भागांमध्ये मिझोरामसाठी होणारी वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. यामुळे मिझोराममध्ये आवश्यक सामग्रीचा तुटवडा भासू लागला आहे. लोकांना पेट्रोल-डिझेल देखील एका मर्यादेत दिले जात आहे.
आसामकडून अघोषित कोंडीमुळे मिझोरामच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व पेट्रोल पंपावर रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. कुणाला किती पेट्रोल-डिझेल द्यावे याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर पेट्रोल-डिझेलसाठी जिल्हय़ाच्या उपायुक्तांची अनुमतीही घ्यावी लागणार आहे.
मिझोराममध्ये दुचाकी वाहनांना आता प्रतिदिन 3 लिटर पेट्रोल दिले जात आहे. याचबरोबर मध्यम आकाराच्या खासगी वाहनांसाठी 5 लिटरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. राज्यात आवश्यक सामग्रीची कमतरता भासू लागल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांनी म्हटले आहे.
याचदरम्यान या ‘ब्लॉकेड’वरून मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी केंद्र सरकारला माहिती दिली आहे. आसामने मिझोरामविरोधात नाकाबंदी केली आहे. केंद्र सरकारने त्वरित यात हस्तक्षेप करावा, येथे बर्लिनची पुनरावृत्ती होऊ देऊ नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
चर्चेद्वारे सुटणार वाद
या पूर्ण तणावादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी हा वाद चर्चेद्वारेच सोडविला जाऊ शकतो असे म्हटले आहे. आमचा भर ईशान्येच्या भावनांना जिवंत ठेवणे आहे. आसाम-मिझोराम सीमेवर जे घडले, ते दोन्ही राज्यांच्या लोकांना मान्य नाही. सीमा वाद चर्चेद्वारेच सोडविला जाऊ शकतो असे शर्मा यांनी म्हटले आहे.