लाखो लोक पुराच्या विळख्यात ः काही भागात खाण्या-पिण्याचीही चणचण
गुवाहाटी / वृत्तसंस्था
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आसामचा बराच भाग पूरमय बनला आहे. पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शनिवारपर्यंत राज्यातील मृतांची संख्या 118 वर पोहोचली आहे. सध्या संपूर्ण आसाममधील 28 जिह्यांना पुराने वेढले आहे. अतिगंभीर परिस्थिती असलेल्या सिलचरमध्ये बचाव आणि मदत कार्याला वेग आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि हवाई दल एकत्रितपणे काम करत आहेत, असे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून सांगण्यात आले.
सर्वात भयावह परिस्थिती बराक खोऱयातील सिलचर शहरात आहे. हा संपूर्ण परिसर सहा दिवस पाण्यात बुडाला आहे. गेल्या 24 तासांत येथे आणखी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्गजन्य आजार पसरण्याबरोबरच येथे अन्न व पिण्याच्या पाण्याचेही संकट निर्माण झाले आहे. एनडीआरएफचे जवान हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या पुरवत आहेत. तसेच बऱयाच भागात बचावकार्यही सुरू आहे.
पूरग्रस्त भागात अडकलेल्या काही लोकांनी सिलचरमध्ये खाण्यापिण्याच्या तुटवडय़ाची माहिती दिली. याचा फायदा घेत नफेखोरीही होत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याच्या एका मोठय़ा बॉटलसाठी 500 रुपये आकारले जात आहेत. तसेच एका मेणबत्तीसाठीही लोकांना 50-50 रुपये मोजावे लागतात. वीजेच्या समस्येबरोबरच मोबाईल कनेक्टिव्हिटीवरही परिणाम होत आहे.
राज्यातील इतर भागांप्रमाणेच बराक खोऱयातही नदीची पाणीपातळा धोकादायक स्थितीपर्यंत पोहोचली आहे. घरांचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अजूनही एक लाखाहून अधिक लोक इमारतींमध्ये अडकले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा फायदा काही समाजकंटक घेत आहेत. काही चोरटे बोटीच्या सहाय्याने बंद दुकाने व घरांवर दरोडा टाकत आहेत. माहिती मिळूनही पोलीस काहीच करू शकत नसल्याचा आरोप लोक करत आहेत.