गुवाहाटी / वृत्तसंस्था
देशात अनेक भागात भयंकर उष्मा असतानाच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी दिल्लीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे वातावरण आल्हाददायक होऊन नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22, 23, 24 मे रोजीही पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दमदार पाऊस पडू शकतो. आसामसह आजुबाजुच्या राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे हाहाकार निर्माण झाला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लाखो लोक बाधित झाले आहेत. राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्यांची संख्या 7 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत 27 जिल्हय़ांना पुराचा फटका बसला आहे. अनेक लोक बेघर झाले असून जवळपास 50 हजार लोकांना 248 मदत छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. लष्कराकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.
केरळमध्ये रेड अलर्ट
केरळमध्ये अतिवृष्टीसंभाव्य स्थितीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ किनारपट्टी आणि कर्नाटकाच्या काही भागात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, 23 मे नंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो. शुक्रवारी कर्नाटकातील हुबळीच्या अनेक भागात पाऊस झाला. त्याचबरोबर तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये पाऊस सुरू झाला आहे. याशिवाय मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्मयता आहे. गेल्या काही दिवसात अरुणाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे.
बिहारमध्ये 33 मृत्यू
राज्यात काही दिवसांपासून सुरु असणारा वळीवाचा पाऊस आणि वादळे यांच्यामुळे एकंदर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यालयाने दिली. विविध जिल्हय़ांना वळीव आणि वादळाचा तडाखा बसला आहे. साहाय्यता कार्य सुरु असल्याचीही माहिती देण्यात आली.