आसू अन् एजेवायसीपीकडून राजकीय पक्षाची स्थापना
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील विद्यार्थ्यांची संघटना ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) आणि आसाम जातीयतावादी युवा छात्र परिषदेने (एजेवायसीपी) एक नव्या स्थानिक राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. मंगळवारी या पक्षाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. स्वतःची बिगरराजकीय ओळख कायम ठेवून ‘आसाम फर्स्ट’साठी काम करत राहणार असल्याचे दोन्ही संघटनांनी म्हटले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या भाजप सरकारला आव्हान देणार असल्यचेही त्यांनी सांगितले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा 1985 च्या आसाम कराराचे उल्लंघन करणारा आहे. 24 मार्च 1971 नंतर राज्यात आलेल्या स्थलांतरितांना हाकलण्याची तरतूद करारात आहे. तर सीएए पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशींना भारतीय नागरिकत्व प्रदान करणारा असल्याचा युक्तिवाद आसूकडून करण्यात आला आहे.
पक्षाचे स्वरुप
प्रस्तावि राजकीय पक्ष 15 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे स्थापन होणार आहे. परंतु पक्षाच्या पूर्ण समितीला ऑक्टोबरच्या सुमारास अंतिम रुप दिले जाणार असल्याची माहिती आसूचे महासचिव लुरिनज्योति गोगोई यांनी दिली आहे. मागील वर्षी सीएए विरोधी निदर्शनांदरम्यान सत्तारुढ भाजप सरकारची भूमिका सर्वांसमोर होती. अशा स्थितीत आसूचे आसामच्या राजकारणात येणे एका बदलाचे कारण असल्याचा दावा गोगोई यांनी केला आहे.
इतिहासात उदाहरण
1985 मध्ये आसूने आसाम गण परिषदेला जन्म दिला होता. बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरितांच्या जटिल आणि भावनात्मक मुद्दय़ाला हाताशी धरून आसाम गण परिषदेने सत्तेपर्यंत धाव घेतली होती.