सीएएद्वारे भारतीय नागरिक होण्याची अंतिम इच्छा राहिली अपूर्ण
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये नागरिकत्व कायदा लागू होऊन स्वतःवरील ‘विदेशी’चा ठपका हटविण्याची आस बाळगून असलेल्या 104 वर्षीय चंद्रधर दास यांचे रविवारी निधन झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना विदेशींसाठी निर्माण करण्यात आलेल्या स्थानबद्धता शिबिरात ठेवण्यात आले होते, जेथे त्यांनी 3 महिने वास्तव्य केले होते. काही दिवसांपासून विस्मृती आणि हृदयविकाराला तोंड देणाऱया दास यांनी ‘विदेशी’ म्हणूनच अखेरचा श्वास घेतला आहे.
पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकून चंद्रधर यांनी ‘मोदी आमारा भगवान (मोदी आमचे भगवान आहेत), नागरिकत्व कायद्याद्वारे ते सर्वांसाठी तोडगा काढतील. आम्ही सर्व भारतीय होऊ असे उद्गार काढले होते, अशी माहिती त्यांची कन्या न्युति यांनी दिली आहे. एक दिवस भारतीय नागरिकत्व मिळेल अशी अपेक्षा त्यांनी होती, मोदींचे फलक पाहताच ते हात जोडून नमस्कार करायचे, असे न्युति म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींकडून त्यांना मोठी अपेक्षा होती, कायदा होऊन वर्ष झाले तरीही कुठलीच कार्यवाही झालेली नाही. दास हे केवळ भारतीय म्हणून मरू इच्छित होते. न्यायालयात धाव घेतली, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो, कागदपत्रे सादर केली, तरीही अद्याप आम्ही कायद्याच्या नजरेत विदेशी आहोत असे न्युति यांनी सांगितले आहे.
दास यांची कथा
पूर्व पाकिस्तानात हिंदूंचे शिरकाण होत असल्याने 50-60 च्या दशकात चंद्रधर दास हे सीमा ओलांडून त्रिपुरात पोहोचले होते. त्रिपुरातून ते आसाममध्ये दाखल झाले होते. 2018 मध्ये अधिकाऱयांनी त्यांना घरातून उचलून ते विदेशींसाठीच्या शिबिरात ठेवले होते. जून 2018 मध्ये त्यांना जामीन मिळाला परंतु त्यांच्या कुटुंबाचा खटला अद्याप प्रलंबित आहे.