वृत्तसंस्था / गुवाहाटी :
आसाममध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 110 झाली आहे. तर 56 लाखांपेक्षा अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्याच्या 30 जिल्हय़ांमध्ये पूरसंकट निर्माण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे काही जिल्हय़ांमधील स्थिती बिकट होत चालल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी सांगितले आहे.
राज्याच्या बहुतांश भागातील स्थितीत सुधारणा झाली असली तरीही धेमाजी, बक्सा आणि मोरीगाव जिल्हय़ात संकट कायम आहे. या तिन्ही जिल्हय़ात पुरामुळे 14,205 लोक प्रभावित झाले आहे. तर 7,009 हेक्टरमधील पिक पाण्याखाली गेले आहे. जोरहाट जिल्हय़ात नेमाटीघाटावर ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. बोंगाईगाव आणि बक्सा जिल्हय़ांमध्ये बंधारे, रस्ते, पूल आणि इमारतींना नुकसान पोहोचले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची मदत
भारताच्या अनेक राज्यांमध्ये पुरामुळे स्थिती बेहाल आहे. पूरसंकट पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने मदतीचा प्रस्ताव दिला आहे. भारतात 770 पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागल्याचे महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे.