नवी दिल्ली, गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम आणि मिझोराम दरम्यान सीमा विवादाचा मुद्दा सोमवारी चव्हाटय़ावर आला. आसाम-मिझोराम सीमेवर आसाम सुरक्षा दल आणि मिझोराममधील नागरिकांमध्ये चकमक झाली असून गोळीबाराचीही घटना घडली. या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील 6 पोलीस ठार झाले असून 50 हून अधिक सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. याप्रश्नी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही एकमेकांवर आरोप करत गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. त्यानंतर अमित शहा यांनी या विषयावर तातडीची बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून सीमेवरील वाद मिटवण्यास सांगितले आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यात झालेल्या चकमकीचा एक व्हिडीओ ट्विट केल्यानंतर हिंसाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट करताना गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत या प्रकरणावर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. पंतप्रधान कार्यालयालाही यात टॅग केल्याने हा वाद दिल्ली दरबारी पोहोचल्यानंतर सीमावादाचा मुद्दा अधिकच बुलंद झाला. याचदरम्यान मिझोराममधील काही असामाजिक घटक आसामच्या सरकारी अधिकाऱयांवर दगडफेक करत आहेत हे दुर्दैव आहे. आसामला जमीन अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी हे अधिकारी लैलापुरात तैनात आहेत, असेही आसाम पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करत या वादात उडी घेतली होती.
सोमवारी पुन्हा सीमेवर भडका
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरू असतानाच प्रत्यक्ष आसाम-मिझोराम सीमेवरही गोळीबार, जाळपोळ, लाठीचार्ज आणि अश्रूधुराचे गोळे फेकण्याचे प्रकार सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना सीमा विवाद चर्चेद्वारे सोडविण्याची सूचना केल्यानंतर दोन्ही राज्यांतील पोलीस दलांनी वादग्रस्त जागेवरून माघार घेतल्याचे सांगितले जात असतानाच सोमवारी दुपारनंतर पुन्हा वाद भडकला. जमावाने केलेल्या गोळीबार आणि दगडफेकीत सहा पोलिसांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.