नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाममधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी अद्याप मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब न झाल्याने तिढा कायम आहे. विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा सरमा हे दोन नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असून शनिवारी दोघांनाही पक्षश्रेष्ठींनी चर्चेसाठी दिल्लीत पाचारण केले होते. दोघांनीही भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत चर्चा केली. या चर्चेत अंतिम दावेदार निश्चित झाला असला तरी त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांची रविवारी गुवाहाटीमध्ये बैठक होणार असून त्यामध्येही मुख्यमंत्रिपद कोणाकडे सोपवावे यासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱया वेळी भाजपने बाजी मारली. 126 विधानसभा जागा असलेल्या भाजपा आघाडीला 75 जागा मिळाल्या आहेत. या विजयात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्याच गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते. परंतु काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि सध्या आरोग्यमंत्री असलेले हेमंत बिस्वा सरमा यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तथापि, सोनोवाल हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.