वादग्रस्त भूमीची सामोपचाराने वाटणी, सीमावादावर तोडगा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसाम आणि मेघालय या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ऐतिहासिक सीमाकरार झाला आहे. त्यानुसार दोन्ही राज्ये सीमेवरील काही प्रदेशाची वाटणी करुन घेणार आहेत. मंगळवारी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी करारावर स्वाक्षऱया केल्या. अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी या कराराची प्रशंसा केली.
आसाम आणि मेघालय या राज्यांच्या सीमेवर असणाऱया आणि वादग्रस्त असलेल्या 36.79 चौरस किलोमीटर भूमीपैकी या करारानुसार 18.51 चौरस किलोमीटर भूमी आसामला तर 18.28 चौरस किलोमीटर भूमी मेघालयला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये प्रदीर्घकाळ चाललेला सीमावाद संपुष्टात येण्यास सहाय्य होणार आहे. हा करार 70 टक्के समाधान करणारा आहे. आगामी काळात सीमावाद 100 टक्के सोडविण्यात यश येईल, असा विश्वास सर्व संबंधितांनी व्यक्त केला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांचे अभिनंदन करत या कराराची महती पत्रकारांसमोर कथन केली.
50 वर्षांच्या समस्येवर तोडगा
मेघालय राज्याच्या निर्मितीपासूनच दोन्ही राज्यांमध्ये सीमावाद होता. सीमेवरील काही खेडय़ांवर दोन्ही राज्यांनी दावा केला होता. साधारणतः 5 दशके या वादासमोर कोणताही तोडगा टिकाव धरत नव्हता. अनेक वेळा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. तथापि, तोडगा निघत नव्हता.
योग्य हाताळणीची आवश्यकता
भविष्यकाळात हा तोडगा कायम रहायचा असेल तर दोन्ही राज्यांनी त्याची योग्य हाताळणी करणे आवश्यक आहे. एकंदर 12 मुद्दय़ांवर दोन्ही राज्यांमध्ये मतभेद आहेत. त्यापैकी सात मुद्दय़ांवर या करारानुसार एकमत झाले आहे. अन्य पाच मुद्देही कालांतराने सोडविण्यात येतील. भूमी, लोकसंख्या, नैसर्गिक संपत्ती इत्यादी महत्वाच्या मुद्दय़ांवर हे विवाद आहेत. या करारामुळे तोडगे काढण्यास प्रारंभ झाला असून इतर वादही लवकरच सोडविण्यात येणार आहेत.
कराराची पार्श्वभूमी
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाच्या तोडग्यासंबंधीचे मसुदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे 31 जानेवारी 2022 या दिवशी दिले होते. सहा मुद्दय़ांवर हे तोडगे होते. दोन्ही राज्यांमधील सीमारेषा 884 किलोमीटर लांबीची आहे. या सीमेवरील 12 स्थानांसंबंधी वाद आहे, अशी माहिती देण्यात आली.
50 वर्षांचे जुने दुखणे
ड 50 वर्षांपासून वादाचे कारण बनलेली समस्या सोडविण्यात यश
ड दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सामंजस्याने तोडगा झाला शक्य
ड वादाच्या अन्य मुद्दय़ांवर शक्य तितक्या लवकर उपाय शोधणार
ड केंद्र सरकारकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आभार, कौतुक