ऑनलाईन टीम / गुवाहाटी :
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तरी देखील काही राज्यांमध्ये लादण्यात आलेले निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्यातच आता आसाम सरकारने देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील निर्बंध 15 जून पर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली. असे असले तरी या निर्बंधांमध्ये एक तास सूट देण्यात आली आहे. तर त्रिपुरा मधील कर्फ्यू 10 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.
आसामचे मुख्य सचिव जिश्रू बरूआ यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुरू असलेला कर्फ्यू दुपारी बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत होता. त्यामध्ये आता एक तासांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात दुपारी एक वाजल्यापासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.
दरम्यान, राज्यातील सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी 12 वाजता पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यासोबतच सर्व आंतर जिल्हा परिवहन सेवा, तसेच नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी असणार आहे. सद्य स्थितीत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4, 28,913 वर पोहचली असून आतापर्यंत 3,577 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.