पंतप्रधान मोदी यांचे परिषदेतील भाषणात प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आसियानची एकात्मता आणि केंद्रीभूतता हे दोन विषय भारतासाठी नेहमीच प्राधान्याचे राहिलेले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेले आहे. ते गुरुवारी भारत-आसियान शिखर परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करीत होते. 2022 हे वर्ष भारत आणि आसियान यांच्या मैत्रीचे वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. भारत आणि आसियान यांच्या भागीदारीला 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण होत आहेत.
भारताचा प्रशांत भारतीय महासागरीय दृष्टीकोन (आयपीओआय) आणि आसियानचे या भागासंबंधीचे धोरण यांच्यात समानता आह. हीच समानता या दोन्ही शक्तींमधील सहकार्याचा बळकट धागा आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्या सर्वांना कोरोनाच्या महासंकटाचे आव्हान झेलावे लागले आहे. मात्र हाच आव्हानात्मक काळ हा भारत-आसियान यांच्या मैत्रीसाठीही कसोटीचा होता. या काळात आपल्यातील परस्पर सहकार्य आणि परस्पर सहानुभूती यांचा अनुभव आला. हेच सहकार्य भविष्यातही सुरु राहील आणि भारत आणि आसियान परस्पर सहकार्य अधिक बळकट करतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
इतिहास साक्षी आहे
भारत आणि आसियान यांच्यातील जोषपूर्ण संबंधांना साक्ष इतिहासाची आहे. दोघांमध्ये हजारो वर्षांपासून दृढ संबंध आहेत. मूल्ये, भाषा, संस्कृती आणि खाद्य यांच्यात मोठे साधर्म्य आहे. याशिवाय धार्मिक तत्वे, वास्तूरचना आणि परंपराही मिळत्याजुळत्या आहेत. या साम्याची झलक आपल्याला आजही पहावयास मिळते. भारताच्या पूर्वेकडे पहा या धोरणातून याची प्रचीती येते. या भागात सुरक्षा आणि समृध्दी असावी हीच भारताची इच्छा आहे. त्यामुळे भारत आसियानशी अधिकाधिक दृढ संबंध संस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे. आसियानचा सध्याचा समन्वयक सिंगापूर आणि पुढचा समन्वयक कंबोडिया यांच्या नेतृत्वात हे संबंध आणखी बळकट होतील, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
आसियानचे 10 देश
आसियान या संघटनेत सिंगापूर, कंबोडिया, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, लाओस, थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार हे दहा देश आहेत. तर भारत, ऑस्टेलिया, अमेरिका, जपान आणि चीन हे या संघटनेचे संवाद भागीदार आहेत. भारत आणि आसियान यांचे संबंध गेल्या 29 वर्षांपासून आहेत.