प्रतिनिधी / दापोली
केवळ गावात राहणाया कुटुंबांना नळपाणी योजनेचा लाभ मिळावा असा ठराव झालेला असतानादेखील प्रशासन व ग्रामसेवक यांनी हॉटेल व्यवसायिकाला पाणी दिल्याच्या प्रकारांनी दापोली तालुक्यातील आसूद ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सदर नळजोडणी तत्काळ काढून टाकली नाही तर ग्रामस्थ यापुढे नळ पाणीपट्टी भरणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला दिला आहे.
दरम्यान या प्रकाराची सभापती रउफ हजवानी यांनी दखल घेतली असून त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शिवाय सदर बेकायदा नळ पाणी जोडणी काढून टाकण्याचे आदेश देखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. तरी देखील जो पर्यंत संपूर्ण नळ जोडणी जप्त करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे.
दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हरवानी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन यांची पाहणी केली. तेव्हा त्यांना रिसॉर्ट पासून काही अंतरावर एका बागेत एका टाकीमध्ये नळपाणी योजनेची जोडणी दिलेली असल्याचे निदर्शनात आले. यावेळी जोपर्यंत संपूर्ण जोडणी काढून टाकण्यात येत नाही. तोपर्यंत ग्रामस्थ पाणी पट्टी भरणार नाही या मुद्यावर ठाम आहेत. यामुळे भविष्यात आसुद ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात पाणी जोडणी वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.