पावसाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यातही आहाराबाबत विशेष दक्षता बाळगावी लागते. या दिवसात रोगराई पसरण्याचा धोका अधिक असल्यामुळे योग्य आहार घेऊन निरोगी रहायला हवं. या दिवसात काय टाळावं याविषयी…
*पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते. त्यातच वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची मोठय़ा प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे या दिवसात दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात खायला हवेत. दही, ताकाच्या थंड प्रवृत्तीमुळे कफ होऊ शकतो. म्हणूनच घशाशी संबंधित आजार तसंच पोटाच्या विकारांना आळा घालण्यासाठी दही, ताक, लस्सीचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं. तसंच शक्यतो गरम दूध प्यावं. हळद घातलेलं दूध अधिक उपयुक्त ठरू शकतं.
* पावसाळ्यात पालेभाज्या खाणं टाळावं. या भाज्यांमध्ये किडे, बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता असल्याने काही काळ पालेभाज्या खाऊ नये. पालेभाज्या खायच्या असतील तर त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. फळंही फार काळ कापून ठेऊ नयेत. लगेच खावी. वांग्याला या काळात कीड लागत असल्याने ही भाजी खाऊ नये. टॉमेटो, सिमला मिरचीचं सेवनही मर्यादित प्रमाणात करावं. तसंच या भाज्या शिजवून खाव्यात.