तीनच केंद्रांवर होणार सामने, अहमदाबाद-चेन्नईत कसोटी, पुणेमध्ये वनडे लढती होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंड संघ भारत दौऱयावर येणार असून या दौऱयाचे वेळापत्रक गुरुवारी बीसीसीआयने जाहीर केले. या मालिकेने भारतात कोरोनाच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या मालिकेत एक डे-नाईट कसोटी होणार असून ही कसोटी नूतनीकरण केलेल्या अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमवर होणार आहे.
कोरोनाच्या संकटामुळे खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागू नये यासाठी या मालिकेतील सामने तीनच केंद्रावर घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार अहमदाबादमध्ये दोन, चेन्नईमध्ये दोन कसोटी खेळविल्या जातील तर तीनही वनडे सामने पुण्यात आयोजित केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 5 टी-20 सामन्यांची मालिकाही अहमदाबादमध्येच खेळविली जाणार आहे. 52 दिवसांच्या या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. रोटेशन धोरणानुसार चेन्नईला पहिल्या दोन कसोटी मिळाल्या असून 5 फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात होईल. पुण्यातील वनडे सामने मार्च 23 ते 28 या कालावधीत होतील.
‘चेन्नईत पहिल्या दोन कसोटी झाल्यानंतर सरदार पटेल मोटेरा स्टेडियममध्ये उर्वरित दोन कसोटी खेळविल्या जातील,’ असे बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. ‘मोटेरा हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनले असून तेथे अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत तर 1 लाख 10 हजार ही त्याची प्रेक्षकक्षमता आहे. कसोटी संपल्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिकाही याच मैदानावर घेतली जाणार आहे,’ असेही त्यात म्हटले आहे.
भारतात येण्याआधी इंग्लंड संघ लंका दौऱयावर वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपमधील दोन सामने खेळणार आहे. हे सामने जानेवारी 14-18 आणि जानेवारी 22-26 या अवधीत होणार आहेत. ही मालिका संपल्यानंतर इंग्लंड संघ 27 जानेवारी रोजी कोलंबोहून थेट चेन्नईत दाखल होणार आहे. गुजरात क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीच्या उद्घाटनावेळी मोटेरावर डे-नाईट कसोटी खेळविली जाणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले. मायभूमीत होणारी भारताची ही दुसरी डे-नाईट कसोटी असेल. याआधी भारताने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध कोलकात्यात पहिली डे-नाईट कसोटी खेळली होती.
वनडे मालिका हा इंग्लंडच्या भारत दौऱयातील शेवटचा टप्पा असेल. या मालिकेतील तीनही सामने पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. ‘कोरोना परिस्थितीचा विचार करून संघांचा प्रवास टाळण्यासाठी फक्त तीनच केंद्रांवर सामने खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. विश्व क्रिकेटमधील या दोन दिग्गज संघांची मालिका रोमांचक व संस्मरणीय ठरावी, यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांनी एकत्रित प्रयत्न केले आहेत,’ असेही शहा म्हणाले.
या रोमहर्षक ठरू शकणाऱया मालिकेची आम्हीही आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत, असे ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले. ‘बीसीसीआयने प्रयत्नपूर्वक या मालिकेचा आराखडा तयार केला असून जैवसुरक्षित वातावरणात फक्त तीनच केंद्रे या मालिकेसाठी त्यांनी निश्चित केली आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यातही नूतनीकरण झालेल्या मोटेरा स्टेडियमवर सामना खेळणारा पहिला विदेशी संघ होण्याचा मानही आम्हाला मिळतोय, याचाही आम्हाला विशेष आनंद झालाय. दोन्ही संघाकडून त्यात संस्मरणीय प्रदर्शन घडेल, अशी मी आशा करतो,’ असेही ते म्हणाले.
पुणे व चेन्नईला सामने देण्याबद्दलचे कारण देताना बीसीसीआयने सांगितले की, रोटेशन धोरणानुसार पुणे व चेन्नईला याआधीच सामने मिळायला हवे होते. या मालिकेतील सामन्यांमुळे त्याची भरपाई त्यांना करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. इंग्लंड संघ जैवसुरक्षित वातावरणातूनच भारतात दाखल होणार असल्याने चेन्नईतील आठवडाभराच्या सॉफ्ट क्वारंटाईनवेळी त्यांना सराव करता येणार आहे. लंकेत दोन कसोटी खेळल्यानंतर हा संघ भारतात येत असल्याने त्यांना सराव सामन्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सराव सामन्याचे आयोजन करण्यात आलेले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
इंग्लंडचा भारत दौरा कार्यक्रम
कसोटी मालिका
पहिली कसोटी 5-9 फेब्रुवारी चेन्नई
दुसरी कसोटी 13-17 फेब्रुवारी चेन्नई
तिसरी कसोटी 24-28 फेब्रुवारी अहमदाबाद (डे-नाईट)
चौथी कसोटी 4-8 मार्च अहमदाबाद
टी-20 मालिका
पहिला सामना 12 मार्च अहमदाबाद
दुसरा सामना 14 मार्च अहमदाबाद
तिसरा सामना 16 मार्च अहमदाबाद
चौथा सामना 18 मार्च अहमदाबाद
पाचवा सामना 20 मार्च अहमदाबाद
वनडे मालिका
पहिला सामना 23 मार्च पुणे
दुसरा सामना 26 मार्च पुणे तिसरा सामना 28 मार्च पुणे.