इंग्लिश संघाची 6 गडी राखून बाजी, सामन्यात दोन्ही संघांकडून 673 धावांची आतषबाजी, मालिकेत बरोबरी
प्रतिनिधी/ पुणे
जॉनी बेअरस्टो (112 चेंडूत 124), बेन स्टोक्स (52 चेंडूत 99) व जेसॉन रॉय (52 चेंडूत 55) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने येथील दुसऱया वनडे सामन्यात भारताचा धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी प्राप्त केली. दोन्ही संघांकडून या लढतीत एकूण 673 धावांची आतषबाजी झाली. भारताने 6 बाद 336 धावांचा डोंगर रचल्यानंतर इंग्लंडने देखील त्यास तोडीस तोड उत्तर देत 43.3 षटकात 4 बाद 337 धावांसह विजयाचे लक्ष्य गाठले.
विजयासाठी 337 धावांचे आव्हान असताना जॉनी बेअरस्टोने 112 चेंडूत 11 चौकार, 7 षटकारांसह 124 धावांची आतषबाजी केली तर बेन स्टोक्सने देखील 52 चेंडूत 4 चौकार, 10 षटकारांसह 99 धावांची आणखी लयलूट केली. प्रारंभी, जेसॉन रॉय व बेअरस्टो यांनी 16.3 षटकात 110 धावांची सलामी दिली तर बेअरस्टो-स्टोक्स यांनी दुसऱया गडय़ासाठी 18.5 षटकातच 175 धावा झोडपल्या.
बेअरस्टो व स्टोक्स 2 धावांच्या अंतराने बाद झाले, त्यावेळी भारताच्या आशाअपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. पण, तोवर खूपच उशीर झाला होता, हेच अधोरेखित झाले. लियाम लिव्हिंगस्टोन (21 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 27) डेव्हिड मलान (23 चेंडूत 16) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. उभय संघातील तिसरी व शेवटची वनडे उद्या (रविवार दि. 28) होणार आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. धावफलकावर केवळ नऊ धावा लागल्या असताना मागील सामन्यात फॉर्मात असलेला शिखर धवन बाद झाला. त्याला रीस टॉपलीने बाद केले. स्टोक्सने त्याचा स्लीपमध्ये झेल घेतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरायला सुरुवात केली. पण, धावफलकावर संघाच्या 37 धावा असताना रोहित 25 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.
इंग्लंडने चांगली सुरुवात करून भारताच्या दोन्ही सलामीवीरांना 37 धावात पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. त्यानंतर कोहली आणि राहुलने भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली व 121 धावांची भागीदारी करून भारताला भक्कम स्थितीत नेले. भारताच्या 158 धावा झाल्या असताना कोहली 66 धावा काढून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर आलेल्या पंतने आक्रमक फलंदाजी करून आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, राहुलनेही आपले पाचवे वनडे शतक पूर्ण केले.
राहुलची फटकेबाजी
या लढतीत केएल राहुलच्या शतकाला रिषभ पंतच्या 40 चेंडूतील 77 धावांच्या जलद खेळीची उत्तम साथ लाभली आणि त्यामुळे भारताला 6 बाद 336 धावांची उत्तम मजल मारता आली. राहुलच्या 114 चेंडूतील शतकी खेळीत 7 चौकार व 2 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला. त्याच्या खेळीमुळे भारताला 300 धावांचा टप्पा सहज सर करता आला.
कर्णधार विराट कोहलीने राहुलसमवेत तिसऱया गडय़ासाठी 121 धावांची साकारलेली भागीदारी विशेष महत्त्वाची ठरली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. सलामीवीर शिखर धवन (4) प्रारंभी स्वस्तात बाद झाला. त्याने रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये बेन स्टोक्सकडे सोपा झेल दिला. त्यानंतर रोहित शर्माच्या (5 चौकारांसह 25) साथीला कोहली क्रीझवर आला. त्याने टॉपलीच्या (2-50)
गोलंदाजीवर 3 आक्रमक चौकार वसूल करत उत्तम सुरुवात नोंदवली. पुढील षटकात मात्र सॅम करणच्या (1-47) फुलपिच गोलंदाजीवर रोहितचा फ्लिकचा प्रयत्न फसला आणि अदिल रशिदने शॉर्ट फाईन लेगवर सोपा झेल टिपत रोहितची खेळी संपुष्टात आणली.
कोहली व राहुल यांनी पुढे धावफलक सातत्याने हलता ठेवला आणि यात कोहली अधिक आक्रमक राहिला. कोहलीला 35 धावांवर महत्त्वाचे जीवदान मिळाले आणि याचा लाभ घेत कोहलीने 66 धावांची खेळी साकारली. येथे त्याने 62 वे वनडे अर्धशतक साजरे केले. रशिदने नंतर कोहलीला बटलरकरवी झेलबाद केले, त्यावेळी भारताची 3 बाद 158 अशी स्थिती होती.
त्यानंतर केएल राहुलने ऍक्सेलेटरवरचा पाय जणू काढलाच नाही. पूल व ड्राईव्हचे घणाघाती फटके लगावत त्याने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा सपाटाच लावला. राहुल बाद झाल्यानंतर रिषभ पंतने हार्दिक पंडय़ासमवेत आक्रमक फलंदाजीवर भर दिला. हार्दिक पंडय़ाने 16 चेंडूतच 35 धावा झोडपल्या. पण, अंतिमतः भारताचे हे प्रयत्न निष्फळ ठरले.