वृत्तसंस्था/ कोलकाता
पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱया भारत आणि इंग्लंड यांच्यातील दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्याचे यजमानपद अहमदाबादला दिले जाईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला दिली.
पुढील वर्षीच्या जानेवारी ते मार्च दरम्यान इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱयावर येत असून या दौऱयात उभय संघामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर मयादित षटकांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या कसोटी मालिकेत एकमेव दिवस-रात्रीचा सामना आयोजित केला जाणार असून या सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाईल. सदर सामना हा या मालिकेतील आकर्षण राहील. या सामन्याचे यजमानपद अहमदाबादच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमला लाभणार असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी कोलकाता प्रेस क्लबतर्फे आयोजित केलेल्या एका समारंभात सांगितले. कोलकाता प्रेस क्लबतर्फे आयोजलेल्या या समारंभात आमदार अशोक भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या एका पुतस्काचे प्रकाशन गांगुलीच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना महामारी परिस्थितीमुळे भारतात होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविली जात आहे. त्याचप्रमाणे भारत-इंग्लंड यांच्यातील आगामी क्रिकेट मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळविण्यासंदर्भात काही जणांना वाटत आहे पण बीसीसीआयने ही मालिका आपल्या देशातच खेळविण्याचे ठरविले आहे. कसोटी मालिकेतील सामने अहमदाबाद, धर्मशाला आणि कोलकाता या तीन ठिकाणी खेळविण्याची शक्यता गांगुलीने वर्तविली असून याबाबत बीसीसीआयकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आगामी राष्ट्रीय क्रिकेट हंगामाबाबत चर्चा करण्यासाठी मंडळाच्या होणाऱया आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत निर्णय घेतला जाईल. 1 जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ करण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे.