चेम्सफोर्ड : यजमान इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने भारताविरूद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील बुधवारी झालेल्या तिसऱया आणि निर्णायक सामन्यात ‘सामनावीर’ डॅनी वॅटच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताचा 8 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 153 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 18.4 षटकांत 2 बाद 154 धावा जमवित हा सामना 8 चेंडू बाकी ठेवून 8 गडय़ांनी आरामात जिंकला.
या सामन्यात भारताच्या डावामध्ये सलामीच्या स्मृती मानधनाने 51 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 70, कर्णधार हरमनप्रीत कौरने 26 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36 तसेच रिचा घोषने 13 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. भारताच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही आणि शफाली वर्मा शून्यावरच बाद झाली. भारताच्या डावात 3 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 35 धावांत 3 तर ब्रंटने 27 धावांत 2 आणि स्किव्हेरने 16 धावांत 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये सलामीची ब्युमाँट 11 धावावर बाद झाली. त्यानंतर वॅट आणि स्किव्हर यांनी दुसऱया गडय़ासाठी 112 धावांची भागिदारी केली. स्किव्हरने 36 चेंडूत 42 तर वॅटने 56 चेंडूत 1 षटकार, 12 चौकारांसह नाबाद 89 तर कर्णधार नाईटने नाबाद 6 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.