इंग्लंडचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचे प्रतिपादन, उभय संघात जोरदार रस्सीखेच होण्याची अपेक्षा, 5 पासून मालिकेला प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इंग्लंडने 2012 मध्ये भारतात ऐतिहासिक कसोटी मालिकाविजय नोंदवला, त्यावेळी त्यांच्या प्रशिक्षणाची धुरा अँडी फ्लॉवर यांच्याकडे होती आणि याच अँडी फ्लॉवरना आताच्या संघातही भारताला नमवण्याची क्षमता दिसून येते आहे. विद्यमान इंग्लिश संघ यंदाही भारताला नमवू शकतो. ही क्षमता त्यांच्यात निश्चितपणाने आहे, असे फ्लॉवर याप्रसंगी म्हणाले. अँडी फ्लॉवर यांनी झिम्बाब्वेतर्फे 63 कसोटी व 213 वनडे खेळले आहेत.
2012 मध्ये इंग्लंडने भारतात 2-1 फरकाने मालिकाविजय साकारला, त्यावेळी ग्रॅहम स्वॅन व मॉन्टी पनेसर या फिरकीपटूंसह अष्टपैलू केव्हिन पीटरसनने त्यात सिंहाचा वाटा उचलला होता. अँडी फ्लॉवर झिम्बाब्वेचे माजी कर्णधार व इंग्लिश क्रिकेट संघाचे अलीकडील इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षक राहिले असून या मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना कोणतेही अंदाज व्यक्त करायचे नाहीत. पण, भारताला नमवण्याची क्षमता इंग्लिश संघात आहे, असे ते आत्मविश्वासाने म्हणतात. अर्थात, भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली असल्याने इंग्लिश संघ अंडरडॉग्ज राहिलेले नाहीत, याचाही ते उल्लेख करतात.
‘भारताने टी-20 मालिका जिंकली. मेलबर्न, ब्रिस्बेनमधील कसोटी सामने जिंकले आणि मालिकाविजयाचा पराक्रमही गाजवला. याचा अर्थ असा होतो की, यजमान संघ कितीही तगडा असला तरी पाहुण्या संघाला विजयाची निश्चितच संधी असते. पण, भारत-इंग्लंड मालिकेत कोणातरी एकाच संघाला फेवरीट ठरवणे कठीण व घाईचे ठरेल’, असे फ्लॉवरनी पुढे नमूद केले.
जो रुटसारखा कर्णधार, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉडसारखे कसलेले अव्वल गोलंदाज आणि बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू संघात असल्याने इंग्लिश संघ कोणताही पराक्रम गाजवू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघात कसर काढण्यासारखे काहीही नाही, याकडे फ्लॉवरनी लक्ष वेधले.
‘माझ्या मते, प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी कसा खेळ होतो, ते अधिक महत्त्वाचे ठरेल. इंग्लिश संघात बरेच अव्वल खेळाडू आहेत आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. जोफ्रा आर्चर अनुभवी आहे. याशिवाय, नवोदित ऑलि रॉबिन्सन, सादिक महमूद, अष्टपैलू सॅम करण यांना अधिक पाठबळ देणे आवश्यक आहे’, असे फ्लॉवर यांचे मत आहे. इंग्लिश संघ लंकेला त्यांच्याच भूमीत 2-0 अशा एकतर्फी फरकाने चारीमुंडय़ा चीत केल्यानंतर भारतात दाखल झाला आहे. उभय संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला दि. 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
फ्लॉवर यांनी आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षकपद सांभाळले असून शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया टी-10 लीग स्पर्धेत दिल्ली बुल्स संघाचे ते मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का, याची चाचपणी केली असता, फ्लॉवर म्हणाले, ‘भारतीय संघ जागतिक स्तरावरील सर्वात महान संघांपैकी एक आहे आणि या संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी लाभणे हा कोणासाठीही सन्मानच असेल’.
रुट, स्टोक्स बहरले नाहीत तर भारताचा विजय निश्चित : पनेसर
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत एकंदरीत बलाबल पाहता, भारतीय संघ क्लीन स्वीप मिळवू शकणार नाही. पण, त्यांनी 2-1 किंवा 2-0 फरकाने ही मालिका जिंकण्याची शक्यता अधिक आहे. जो रुट खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला, तसेच बेन स्टोक्सने जलद धावा केल्या तरच ते भारताचे कर्दनकाळ ठरु शकतात, असे मत माजी इंग्लिश फिरकीपटू मॉन्टी पनेसरने मांडले. यापूर्वी, 2012-13 मध्ये इंग्लंडने भारतात ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केला, त्यावेळी पनेसरने 3 कसोटीत 17 बळी घेतले होते.
भारत-इंग्लंड यांच्यात आजवर 60 कसोटी सामने झाले असून त्यात भारताने 19 तर इंग्लंडने 18 विजय मिळवले. उर्वरित 28 सामने अनिर्णीत राहिले आहेत. दोन्ही संघ चेन्नईत 9 वेळा आमनेसामने भिडले असून त्यात भारताने 5 तर इंग्लंडने 3 विजय संपादन केले. 1982 मधील कसोटी सामना अनिर्णीत राहिला.
‘भारताने बरेच मुख्य खेळाडू संघाबाहेर असताना ऑस्ट्रेलियात मालिकाविजय खेचून आणण्याचा पराक्रम गाजवला, त्याचे श्रेय मुख्यत्वेकरुन प्रशिक्षक रवी शास्त्रींना द्यावे लागेल. ऍडलेड कसोटीतील दुसऱया डावात 36 धावात धुव्वा उडाला. तरीही शास्त्री यांनी या संघाकडून प्रेरणादायी खेळ साकारुन घेतला. प्रशिक्षकपदी रवी शास्त्री व बीसीसीआय अध्यक्षपदी सौरभ गांगुली यांच्या निवडी भारतीय क्रिकेटला पुढे नेणाऱया आहेत’, असे पनेसर याप्रसंगी म्हणाला.