नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या तीन पात्रता फेरीपैकी एक असणारी इंडिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर टाकली गेली आहे. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, 4 लाख बक्षीस रकमेची ही स्पर्धा दिल्लीत दि. 11 ते 16 मे दरम्यान होणार होती.
‘सध्याची आव्हाने पाहता, आमच्याकडे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही’, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे महासचिव अजय सिंघानिया यांनी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले. यापूर्वी 2020 ची इंडिया ओपन स्पर्धा सुद्धा प्रारंभी मार्चपासून डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकली गेली होती. कालांतराने ती रद्द करावी लागली होती. गतवर्षी सय्यद मोदी सुपर 300 इव्हेंट देखील कोरोनामुळे रद्द करावी लागली होती.
‘स्पर्धा दुसऱयांदा लांबणीवर टाकावी लागणे दुर्दैवी आहे. पण, परिस्थिती सुधारेल, असा आम्हाला आशावाद आहे. आम्ही स्पर्धेचे यशस्वी आयोजन करु शकू, याची खात्री वाटते. तूर्तास आम्ही सुधारित रुपरेषा जाहीर करणार नाही. भविष्यात परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल’, असे सिंघानिया याप्रसंगी पुढे म्हणाले. दिल्लीत अलीकडे कोरोनाचा उद्रेक झाला असून रविवारी एकाच दिवशी 25462 नवे रुग्ण आढळून आले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता, तेथे 6 दिवसांचे लॉकडाऊन देखील जाहीर केले गेले आहे.