पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण ः 125 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यसेनानीला आदरांजली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेट येथे त्यांच्या होलोग्राम प्रतिमेचे पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते रविवारी अनावरण करण्यात आले. ग्रेनाइटने निर्मित पुतळा तयार झाल्यावर तो होलोग्राम प्रतिमेची जागा घेणार आहे. होलोग्राम पुतळय़ाला 30 हजार लुमेनच्या 4के प्रोजेक्टरने संचालित करण्यात आले आहे. या प्रतिमेचा आकार 28 फूट उंच आणि 6 फूट रुंद असणार आहे. एक अदृश्य 90 टक्के पारदर्शक होलोग्राफिक स्क्रीन तेथे येणाऱया लोकांच्या नजरेत पडणार नाही अशा पद्धतीने लावण्यात आली आहे. होलोग्रामचा प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यावर नेताजींचे थ्रीडी छायाचित्र लावले जाणार आहे.
भारताच्या भूमीवर पहिले स्वतंत्र सरकार स्थापन करणाऱया नेताजींची भव्य प्रतिमा आज डिजिटल स्वरुपात इंडिया गेटनजीक स्थापन होत आहे. लवकरच या होलोग्राम प्रतिमेच्या जागी ग्रेनाइटचा महाकाय पुतळा बसविला जाणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले आहे.
स्वतंत्र भारताच्या स्वप्नावरील विश्वास कधीच गमावू नका. जगातील कुठलीच शक्ती भारताचा निश्चय ढळण्यास कारणीभूत ठरू शकत नसल्याचे नेताजी म्हणायचे. आज आमच्यासमोर स्वतंत्र भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचे लक्ष्य आहे. आमच्यासमोर स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपूर्वी नव्या भारताच्या निर्मितीचे लक्ष्य असल्याचे मोदी म्हणाले.
भारत स्वतःची ओळख आणि प्रेरणंना पुनर्जीवित करणार हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संकल्प आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची संस्कृती आणि संस्कारांसोबत अनेक महान व्यक्तिमत्वांचे योगदान मिटविण्याचे काम करण्यात आले हे दुर्दैवी असल्याचे उद्गार मोदीनी काढले आहेत.
मागील वर्षापासून देशाने नेताजींच्या जयंतीदिनी पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पराक्रम दिनानिमित्त आज आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याची प्रेरणा नेताजींच्या जीवनातून घेतली आहे. आमच्या देशातील आपत्ती व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहता तहान लागल्यावर विहिर खोदणे ही म्हण लागू पडते. पूर्वी काळात आपत्तीचा विषय कृषी विभागाकडे होता. देशात आपत्ती व्यवस्थापन असेच चालायचे. 2001 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर जे घडले ते देशाला नव्याने विचार करण्यास भाग पडल्याचे मोदींनी म्हटले आहे.
या होलोग्राफिक प्रतिमेच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा निर्माण करण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. हा पुतळा देशाच्या आगामी पिढय़ांना पराक्रम, देशभक्ती आणि बलिदानाची प्रेरणा देणार आहे. हा पुतळा देशाच्या कोटय़वधी लोकांच्या भावनांची अभिव्यक्ती असेल असे शाह यांनी म्हटले आहे.
पुरस्कारांचेही वितरण
होलोग्राम पुतळय़ाच्या अनावरणासोबत पंतप्रधान मोदींनी 2019, 2020, 2021 आणि 2022 साठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देखील वितरित केले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी रविवारी सकाळी संसद भवनात सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्रासमोर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली होती.