वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने मंगळवारी पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अशरफच्या मुसक्या आवळल्या होत्या. या दहशतवाद्याने चौकशीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. दहशतवादी अशरफने दिल्लीत अनेक ठिकाणांची रेकी केली होती. 2011 च्या दिल्ली उच्च न्यायालय परिसरातील स्फोटापूर्वी त्याने रेकी केली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये माझ्यासमोर दहशतवाद्यांनी अनेक सैनिकांचे अपहरण केले होते. काही काळ त्यांना ओलीस ठेवून नंतर त्यांची हत्या करण्यात आल्याने अशरफने चौकशीवेळी सांगितले आहे. अशरफ 2005-06 मध्ये अजमेर येथे राहिला होता. तेथे त्याने पीर-फकीराचे सोंग धारण करून अनेक भागांची रेकी. दहशतवाद्याचे हँडलिंग आयएसआय करत होते, त्याच्या हँडलरचे कोड नेम नासिर होते. त्याच्याकडून अनेक बनावट ओळखपत्र मिळाली आहेत. तसेच त्याने भारतीय पासपोर्ट मिळवून थायलंड आणि सौदी अरेबियाचाही प्रवास केला होता. कागदपत्रे मिळविण्यासाठी त्याने गाजियाबादमध्ये भारतीय महिलेसोबत विवाह केला होता.
चौकशीदरम्यान 2011 च्या दिल्ली उच्च न्यायालय स्फोट प्रकरणातील एका आरोपीचे छायाचित्र दाखविण्यात आले असता त्याने आपणच या हल्ल्यासाठी रेकी केल्याची कबुली एनआयएसमोर दिली आहे. या स्फोटात त्याचा किती सहभाग होता याची चौकशी आता केली जाणार आहे. अशरफची एनआयए, रॉ आणि एमआयकडून दीर्घ चौकशी करण्यात आली आहे.
याचबरोबर त्याने पोलीस मुख्यालयाची रेकी करत तेथील तपशील पाकिस्तानातील स्वतःच्या हँडलर्सना पाठविला होता. इंडिया गेट आणि लाल किल्ल्यासह 10 ठिकाणांची त्याने रेकी केली होती. दहशतवादी हल्ला घडवून आणू पाहणाऱया ठिकाणांबद्दल त्याने अद्याप खुलासा केलेला नाही.
पाकिस्तानातून सर्वप्रथम बांगलादेशात जात आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याचा प्रवास करत भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर अजमेर शरीफ येथे जात बिहारच्या लोकांची भेट घेतली, त्यांच्यासोबत यांच्या गावात जात त्याने आश्रय घेतला होता. बिहारमध्ये त्याने एका सरपंचाच्या मदतीने ओळखपत्रे मिळविली होती असे चौकशीत समोर आले आहे.