ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असताना अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकून पडले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र, सध्या देश लॉकडाऊन करण्यात आल्याने इंडोनेशियात 33 भारतीय अडकले आहेत. लवकरात लवकर आपली सुटका करावी यासाठी ते केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागत आहेत.
इंडोनेशियामध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील पाच ते सहा जण असून, बाकीचे दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि इतर ठिकाणचे आहेत. या सर्वांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून आपल्याकडे 30 मार्चपर्यंत पुरेल एवढाच पैसा असून त्याआधी आपल्याला मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
इंडोनेशिया अडकलेल्या दिनेश पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बालीमध्ये अडकले असून त्यांच्यासह तिथे 14 जण भारतीय नागरिक आहेत. तर इतर ठिकाणी 19 जण अडकले आहेत. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी वारंवार भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे आमची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.