नाष्टा-जेवणाचा दर्जा घसरल्याने नागरिकांची पाठ
प्रतिनिधी /बेळगाव
गोरगरीब जनतेची भूक भागविणाऱया इंदिरा कॅन्टीनकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील इंदिरा कॅन्टीन ओस पडू लागली आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभी केली आहेत. मात्र या ठिकाणी मिळणाऱया नाष्टा आणि जेवणाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
शहरातील बसस्टँड रोड, एपीएमसी आवार, आझमनगर, जिल्हा रुग्णालय, क्लब रोड, गोवावेस, नाथ पै सर्कल आदी ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभी करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या काळात या कॅन्टीनना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र आता याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
या कॅन्टीनमधून सकाळचा नाष्टा 5 रुपयात तर दुपारचे जेवण केवळ 10 रुपयात दिले जाते. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी जनतेला ही इंदिरा कॅन्टीन आधार ठरत आहेत. मात्र नाष्टा आणि जेवणाचा दर्जा घसरला आहे. त्यातच प्रशासनाकडून इंदिरा कॅन्टीनसाठी मिळणारे अनुदानही कमी झाले आहे. त्यामुळे काही इंदिरा कॅन्टीन सक्रिय नसल्याची दिसत आहेत. तर काहीवेळेला ही कॅन्टीन बंद असतात. त्यामुळे जनतेला माघारी फिरावे लागते.
गतवषी कोरोनाकाळात इंदिरा कॅन्टीन बंद राहिल्याने अनेकांसमोर पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता. मध्यंतरी महानगरपालिकेकडून मिळणारे अनुदान थांबल्याने काही कॅन्टीन बंद होती. मात्र आता काही दिवसांपासून सुरू झालेल्या इंदिरा कॅन्टीनना प्रतिसाद कमी झालेला पहायला मिळत आहे. कोरोनाकाळात अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल झाले. अशा संकटकाळात ही योजना यशस्वी ठरली असती. मात्र काही कॅन्टीन बंद राहिल्याने अनेकांसमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शहरातील सर्व इंदिरा कॅन्टीन सुरळीत सुरू ठेवावीत, अशी मागणी होत आहे.