ऑनलाईन टीम / मुंबई :
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज होणार होता. मात्र, अनेकांच्या नाराजीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, आता यावरुन राजकारण करु नये असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले, इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही, त्यामुळे यावरून कोणीही राजकारण करु नये, असे स्पष्ट केले.
दरम्यान, ‘एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश दिले आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.